द पॉईंट नाऊ: प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या अंतर्गत खरीप व रब्बी हंगाम २०२२-२३ करिता विमाक्षेत्र अधिसूचित करून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेत पिकांच्या झालेल्या नुकसानीला विमा संरक्षण मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीच्या तालुका व जिल्हास्तरीय विमा प्रतिनिधींशी वेळेत संपर्क साधून तक्रार दाखल करण्याचे मागणी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केली आहे.
प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०१६-१७ हंगामापासून राबविण्यात करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पिकांचे काढणी दरम्यान व स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी पीक विमा संरक्षण देण्यात येणार असून, यामध्ये पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, भूस्खलन, पावसातील खंड, कीड व रोग यामुळे झालेल्या नुकसानामुळे उत्पादनात येणारी घट जोखमीच्या बाबींमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच या योजनेत खरीप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, भुईमूग, सोयाबीन, कारळा, मूग, उडीद, तूर, कापूस व कांदा या पिकांसाठी विमा संरक्ष प्राप्त झाले असून जिल्ह्यात या योजनेंतर्गत १ लाख ६५ हजार ६० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.
हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान तसेच पिकांचे काढणीपश्चात व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान इत्यादी बाबींचा या योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे. याकरिता शेतकऱ्यांनी नियुक्त करण्यात आलेल्या एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनीकडे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत तक्रार दाखल करावी. असे आवाहन प्रशासनातर्फे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम