नाशिक – बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले असून नाशिककरांना त्यातूनच प्रवास करावा लागत असल्याने आता शहरात वाहन चालवणे हे दिवास्वप्न बनले आहे.
शहरातील पंचवटी, आडगाव, टाकळीरोड पासून ते मुंबई-पुणे महामार्ग, जुना नाशिक, सिडको, सातपूर आदी भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून शहरवासियांना जीव धोक्यात घालून ह्या खड्ड्यांमध्ये प्रवास करावा लागतोय. त्यामुळे शहरात प्रवास करणे आता अधिक जिकरीचे झाले असल्याचे नाशिककरांचे म्हणणे आहे.
शहरात पाऊस सुरू झाल्यापासून दिवसेंदिवस रस्त्यांची अवस्था बिकट होत चालली आहे. सामान्य नागरिक जे कामावर जाण्यासाठी दुचाकी वापरतात त्यांना रस्त्यांच्या ह्या दुरवस्थेचा त्रास होत आहे. कारण त्यांना ह्या खड्ड्यांमधून सामान्य पॅच शोधण्यासाठी अनेक धडपड करावी लागते. मात्र त्यामुळे अपघात होण्याची शक्यता होते, म्हणून आम्ही सहसा चांगला रस्ता बघून वाहने तिकडे वळवित असल्याचेही अनेकांनी बोलून दाखवले.
दरम्यान, महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनीही शहरातील संततधार पावसाला जबाबदार धरून रस्त्यांची अवस्था बिकट झाली असल्याचे सांगितले. यावेळी आयुक्त म्हणाले, आम्ही गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याचे काम केले होते आणि मोठ्या प्रमाणात खराब झालेले रस्ते दुरुस्त केले. पण दुर्दैवाने, पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने पुन्हा ह्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र, मनपाकडून ह्या रस्त्यांची पुन्हा पूर्णपणे डागडुजी करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम