Discharge of water : नाशिककरांसाठी जून महिना कोरडाठाक गेला असला तरी मात्र जुलै महिन्यात बऱ्याच प्रमाणात नाशिक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. यातच आता नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणा मधून विसर्ग करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. गंगापूर धरणातून केला जाणारा यावर्षीचा हा पहिलाच विसर्ग असणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. यामुळे जिल्ह्यातील चार धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण क्षेत्रामध्ये त्र्यंबकेश्वर परिसरात सातत्याने पाऊस सुरू आहे. यामुळे नाशिक शहराची जीवनदायिनी समजल्या जाणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा 70 टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे.
यात सततच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने गंगापूर धरणा मधून 559 दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. तर यावर्षीचा हा पहिलाच विसर्ग असणार आहे.
दरम्यान दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाण्याच्या विसर्गाला सुरुवात केली जाणार असल्याने नदीकाठी असलेल्या व्यवसायिक आणि रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विसर्ग होण्यासाठी काही तास उरल्याने नाशिक महानगरपालिका प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. महानगरपालिकेचे सर्व विभागीय अधिकारी यांनी आपापल्या भागामध्ये नागरिकांना सूचना देण्याचे आदेश मनपा आयुक्त करंजकर यांनी दिले असून ते देखील या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
नाशिक जिल्ह्यातील चार धरणांमधून आज पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामध्ये दारणा धरणा मधून 2963 क्युसेस, भावली धरणामधून 290 क्यूसेस, नांदूर मध्यमेश्वर धरणा मधून 5576 क्युसेस पाणीसाठा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम