मुंबई : शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी, बेरोजगार तरुणांसाठी पोलिस व नोकर भरती यासाठी आपले सरकार प्रयत्नशील आहे. तसेच राज्याच्या विकासाच्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरु असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
आज राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी सर्वांना यावेळी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेली दोन वर्ष आपल्यावर निर्बंध होते. मात्र यंदा सर्व सण मुक्त आणि मोकळ्या वातारवणात साजरे करत आहोत. सकारात्मक बदल आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत आहे, तसेच कामालाही गती मिळाली आहे. महाराष्ट्राकडे सगळे आशेने आणि विश्वासाने पाहू लागले आहेत.
यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, बाळासाहेब नेहमी सांगायचे समाजकारण आणि राजकारणात समाजकारणाला प्राधान्य द्या. तसेच आनंद दिघे यांनीदेखील सर्वांना सोबत घेऊन त्यांच्या हक्कासाठी लढायला शिकवले. म्हणून राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगारवर्ग अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आमचा ध्यास आहे.
ते हेही म्हणाले की, सरकारने राज्यातील ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत एसटी बस योजना सुरु केली. तसेच दिवाळीसाठी शिधापत्रिका धारकांना केवळ १०० रुपयात आनंदाचा शिधाचे वाटप केले असून ते अजूनही सुरु आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना एनडीआरफच्या मदतीच्या दुप्पट आणि दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर मर्यादेवर नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये जवळपास ३० लाख शेतकऱ्यांना चार लाख कोटींची मदत मिळत आहे, असं ते म्हणाले आहे.
राज्यात पोलीस भरतीला आम्ही सुरुवात केली असून २० हजार पोलीस शिपाईची पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासोबतच राज्यातील विविध विभागातील ७५ हजार पदांची भरती लवकरच भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. तसेच आरोग्यासाठी दुप्पट निधी देण्याचा प्रयत्न असून राज्यात ७०० बाळासाहेब ठाकरे औषध केंद्र सुरु करणार आहे. यात “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” मध्ये चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी सुरु असल्याचे ते म्हणाले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम