राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद | इगतपुरी तालुक्यात सलग दोन दिवस पडलेल्या बेमोसमी पावसाने दमदार हजेरी लावल्याने इगतपुरीच्या पूर्व भागातील पिंपळगाव मोर, धामणी, बेलगाव, खेड, वासाळी, इंदोरे, खडकेद, आंबेवाडी, मांजरगाव, टाकेद, अडसरे, सोनोशी, बारशिगवे, मायदरा, धामणगाव परिसरात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली. या पावसामुळे पूर्व भागातील टाकेद पट्ट्यात अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले असून, सोमवार व मंगळवारी या दोन दिवसांत सर्वत्र परिसरात पावसाची दमदार हजेरी पहायला मिळाली.
दरम्यान दोन दिवसानंतर पावसाने या भागात उघडीप दिल्याने या परिसरात खरीप हंगामाच्या शेती मशागतीला बळीराजाने सुरुवात केली असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची नांगरणी, पेरणी चालू झाली आहे. तर काही ठिकाणी भाताच्या रोपांसाठी शेतातील जागा तयार करण्याचे काम चालू आहे. दरवर्षीच्या तुलनेत गतवर्षी कडाक्याचा उन्हाळा असल्याने तीव्र पाणी टंचाई या भागात भेडसावली परिणामी वन्य प्राणी पशु पक्ष्यांच्या तृष्णेचा विषय गंभीर झाला होता अनेक ठिकाणी झाडे होरपळून वाळून गेली होती.
अश्या परिस्थितीत वरूण राजाने दमदार एन्ट्री मारल्याने काही प्रमाणात मुक्या जीवांचा पशु पक्ष्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. अनेक ठिकाणी नद्या नाले पाण्याने भरलेल्याने वन्य सजीव सृष्टीला नवसंजीवनी मिळाली आहे. शेती पूरक पाऊस झाल्याने अशा परिस्थितीत शेकऱ्यांची खते, बियाणे खरेदीसाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
दरम्यान दोन दिवस बरसलेल्या पावसाने शेतकरी वर्गासह वन्य सजीवसृष्टीतील घटकांना काहीसा दिलासा दिला आहे. दरम्यान यावर्षी इगतपुरीतील मोठमोठी सात धरणे कोरडी पडलेली आहेत. यामुळे स्थानिकांसह अनेक ठिकाणचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला असून, अशातच अचानक पडलेल्या पावसामुळे सर्वत्र परिसरात काहीसा गारवा निर्माण झाल्यानर नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम