तब्बल ५ वर्षांनी होणार सप्तश्रृंगीगडावर बोकडबळीची प्रथा; हायकोर्टाने बंदी उठवली

0
35

नाशिक : पाच वर्षांपूर्वी प्रशासनाने वणी येथील सप्तश्रृंगीगडावर दसऱ्याच्या मुहूर्तावर बोकडबळी देण्याच्या प्रथेवर बंदी आणली होती. त्यावर दाखल झालेल्या याचिकेवर निर्णय देत मुंबई हायकोर्टाने ह्या प्रथेला सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे तब्बल ५ वर्षांनी वणी सप्तश्रृंगीगडाच्या पायथ्याशी होत असलेला बोकडबळीची प्रथा पुन्हा सुरु होणार आहे.

सप्तश्रृंगीगडावर दसऱ्याच्या मुहूर्तावर देवी मंदीराच्या पायऱ्यांवर पूर्वीपासून प्रथा-पंरपरेनूसार बोकड बळी देण्याची प्रथा आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने पाच वर्षांपासून यावर बंद आणली होती. प्रशासनाच्या निर्णयाविरुध्द सुरगाणा तालुक्यातील धोंडाबे येथील आदिवासी विकास संस्थेने जुलै २०१९ मध्ये हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर गुरुवार (दि. २९) झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल देत गडावर बोकडबळी देण्याची प्रथा पूर्ववत सुरु करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. यावेळी याचिकाकर्त्यांच्या बाजूने अॅड. दत्ता पवार यांनी बाजू मांडली आहे. तसेच भाविक सुधीर सोनवणे व सप्तश्रृंगीगड, नांदुरी व अन्य परिसरातील गावांतील ग्रामस्थांनी यासंदर्भात पाठपूरावा केला आहे.

वणी सप्तश्रृंगीगडावर नवरात्रोत्सवाची सांगता विजयादशमीने होत असते. ह्यादिवशी बोकड्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढून गडावरील दिपमाळ परीसरातील दसरा टप्प्यावर बोकड्यास नेवून त्याची पारंपारिक पद्धतीने पूजाअर्चा करुन बळी देण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. यावेळी बोकडबळी देताना सप्तश्रृंगी माता न्यासाच्यावतीने मानवंदना म्हणून हवेत गोळीबार करण्याची पंरपरा होती. मात्र ११ सप्टेंबर २०१६ रोजी परंपरेनूसार बोकडबळी देण्याचा विधी सुरु असताना ट्रस्टच्या सुरक्षारक्षकाकडून अनावधानाने रायफलमधून गोळी सुटून भिंतीवरील दगडावर आपटलेल्या गोळीचे छरे उडाले. यात सुदैवाने जीवितहानी टळली होती, पण त्यामुळे १२ भाविक जखमी झाले होते.

तसेच ह्या प्रथेत सहभागी होण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत असल्याने भविष्यात या प्रथेमळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने ही प्रथा बंद व्हावी, अशी शिफारस जिल्हा प्रशासनाला केल्यामुळे सप्टेंबर २०१७ पासून गडावरील बोकडबळी व हवेत गोळीबार करण्याच्या प्रथेस तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बंदी घातली होती.

दरम्यान, दसऱ्याच्या दिवशी बोकडबळी देण्याची प्रथा ही वर्षानुवर्षे सुरु असून आदिवासी बांधवाच्या सानिध्यात श्री सप्तश्रृंगी मातेचे स्थान आहे. त्यानुळे परंपरेनूसार धार्मिक कार्यावेळी बोकडबळी देण्याची परंपरा यात आहे. जर बोकडबळी दिला नाही तर गडावर दरड कोसळणे, अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्ती येऊन दुर्घटना होवू शकतात असा आदिवासी बांधवांबरोबरच ग्रामस्थांचा समज आहे. पण प्रशासनाने ग्रामस्थ, ग्रामपंचायत, आदिवासी बांधव आदींना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप केला होता. तसेच देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी कोल्हापूर येथे भवानीमातेच्या मंदिरासमोर तसेच तुळजापूर येथेही नवमीच्या दिवशी हजारो भाविक व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बळी देण्याची परंपरा सुरु असताना सप्तश्रृंगीगडावरील घातलेला बोकडबळी बंदीचा निर्णय हा लोकभावना, श्रध्दा व धार्मिक भावना दुखवणारा आहे. त्यामुळे प्रशासनाने घातलेली बंदी उठवावी, यासाठी सप्तश्रृंगीगड, नांदुरी, मोहनदरी, गोलदरी, दरेगाव येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्यावतीने ही जनहित याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली असून यात याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात सर्वसहमतीने प्रशासनाने बंद केलेली प्रथा अटी-शर्तीनूसार पूर्ववत करण्यास हरकत नसल्याची एकत्रीरीत्या मान्य असल्याचे पत्र सादर केले. व कोर्टाने ही बंदी उठवत प्रथा-पंरपरेनूसार बोकडबळी देण्यास सशर्त परवानगी दिली आहे. त्यामूळे येत्या ५ ऑक्टोंबर रोजी दिला जाणारा बोकडबळीचा विधी हा पाच वर्षांनी गडावरील दसरा टप्पा येथे पुन्हा होणार असल्याने समस्थ भाविक व सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here