मागील चार महिन्यात जिल्ह्यात तब्बल २४ बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश….

0
31

द पॉईंट नाऊ: करोना महामारीत व त्यानंतरच्या कालावधीतही बालविवाहाचे प्रमाण वाढलेले निदर्शनास आले. शासकीय यंत्रणेकडून शर्तीचे प्रयत्न सुरू असतांनादेखील छुप्या पद्धतीने अल्पवयीन मुला- मुलींचे लग्न लावण्याचे प्रयत्न होत आहेत. गेल्या चार महिन्यांत तब्बल २४ बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश आले आहे. यापैकी आठ घटना एकट्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आहेत.

जिल्ह्यात अनेकदा प्रशासनाची नजर चुकवत बालविवाह लावण्याचे प्रयत्न उघडकीस आलेले आहेत. अशा घटनांमध्ये बालविवाह लावणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाईदेखील करण्यात आलेली आहे. तरीदेखील जिल्ह्यातील बालविवाह पूर्णपणे थांबविण्यास प्रशासनाला अपयश येत आहे. हलाखीची आर्थिक परिस्थिती, गरिबी, कुप्रथा अशा कारणांमुळेम अल्पवयीन मुलींचे विवाह लावण्याचे प्रयत्न होत आहेत. विशेषतः आदिवासी दुर्गम भागात बालविवाहाचे प्रकार चिंता वाढविणारे आहेत. ग्रामपातळीवर समित्या स्थापन करून व सामाजिक जनजागृती करूनदेखील अनेक ठिकाणी सर्रासपणे बालविवाह लावण्याचे प्रकार घडत आहेत. या घटनांमध्ये प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. जिल्हा महिला व बालकल्याण विभाग, पोलिस विभागासह अन्य शासकीय विभागाच्या सहकार्याने नुकताच जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, निफाड, सिन्नर, देवळा, बागलाण, येवला, नांदगाव, मालेगाव आदी तालुक्यांमध्ये धडक कारवाई करताना बालविवाह रोखलेले आहेत. अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची कारवाईसाठी मदत घेण्यात आली. दरम्यान, आढळलेल्या प्रकारांपैकी १८ वर्षे पूर्ण होण्यास अल्प मुदत असलेल्या मुलींच्या पालकांना समज देऊन त्यांच्या ताब्यात बालिकेला सुपूर्द करण्यात आलेले आहे. तर काही प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलींच्या पालकांकडून हमीपत्र घेण्यात आलेले आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात आठ , मालेगावात चार,नांदगावात तीन, निफाड तीन, बागलाण दोन, देवळा एक,इगतपुरी एक, तर सिन्नर एक अशी एकूण २४ रोखण्यात यश आलेली तालुकानिहाय बालविवाह प्रकरणे आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here