Accident : नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील शिरवाडे वणी या ठिकाणी सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये एकाच घरातील तिघा जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
नाशिक मध्ये सध्या अपघातांचा सत्र मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दररोजच होणाऱ्या अपघातांमध्ये गेल्या काही दिवसात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. तर अनेक जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.
असाच एक अपघात नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावरील शिरवाडे वनी फाट्याजवळ रात्री अकरा वाजेच्या सुमारास झाला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस ला हा भीषण अपघात झाला असून या अपघातात शिरवाडे वणी गावातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण शिरवाडे वणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पिंपळगाव बसवंत येथून जवळपास नऊ किलोमीटर अंतरावर शिरवडे वणी फाटा आहे. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एम एच 17 बी आर 7972) ही नाशिककडे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने परिवहन महामंडळाच्या बसला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जबर होती की यात दुचाकी दूरवर फरफटत गेली आणि या अपघातामध्ये नितीन भास्कर निफाडे, मयूर चंद्रकांत निफाडे, सुभाष माणिकराव निफाडे या तिघाही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत झालेले हे तिघेही जण एकाच कुटुंबातील आहेत.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बस चालक दीपक शांताराम पाटील याला अटक केली आहे तर अपघातामुळे ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. मात्र या अपघातामध्ये एकाच घरातील तिघेजण मृत्युमुखी पडल्याने निफाडे कुटुंबासह शिरवाडे वनी गावावर शोककळा पसरली आहे तर पुढील तपास पोलीस करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम