Mumbai : बैलगाडा शर्यतीत झालेल्या वादातून अंदाधुंद गोळीबार केल्याप्रकरणी कारागृहात असलेले महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांची कारागृहातून अखेर सुटका झाली आहे. त्यांना मोक्का कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. गेल्या आठ महिन्यांपासून फडके हे ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीची शिक्षा भोगत होते.
पनवेल येथे रहाणारे महाराष्ट्र राज्य बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे राहुल पाटील यांच्यामध्ये बैलगाडा शर्यतीवरून वाद होते. या वादातून नोव्हेंबर २०२२ मध्ये अंबरनाथ एमआयडीसी परिसरात फडके समर्थकांनी राहुल पाटील आणि त्यांच्या समर्थकांवर अंदाधुंद गोळीबार केल्याने फडके यांच्यासह एकूण ३२ जणांवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. व त्यांना अटक झाली होती.
दरम्यान ८ महिने ठाणे मध्यवर्ती कारागृहात राहिल्यानंतर अखेर फडके यांची मुंबई उच्च न्यायालयानं आज जामिनावर सुटका केली आहे. जामिनासाठी त्यांच्याकडून ५० हजारांची हमी घेण्यात आली असून नियमांचे उल्लंघन झाल्यास जामीन रद्द करण्याचा इशारा देखील यावेळी न्यायालयाने दिला आहे. याचबरोबर पुढील २ वर्ष प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी फडके यांना अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन हजेरी लावावी लागणार आहे. मात्र फडके यांची सुटका झाल्याने बैलगाडा शर्यतींना पुन्हा एकदा रंगत येईल अशी चर्चा राज्यभरातील शर्यत प्रेमींमध्ये रंगायला सुरवात झाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम