द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : तीर्थक्षेत्र नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील गोदावरीचे नदीचे संवर्धन करण्यासाठी गोदासेवकांना नदी संवर्धन अविरल कलश देत त्यास सुरुवात केली. या उपक्रमात प्रामुख्याने अविरल गोदावरी नदी ही कायमच स्वच्छ, सुंदर व बारमाही शुद्ध पाणी देत वाहण्यासाठी आता शासन आणि समाज गोदाप्रेमी एकत्र आले असून हे कार्य मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल, अशी आशा सर्व मान्यवर व्यक्त करत आहेत.
तीर्थक्षेत्र नाशिक-त्र्यंबकेश्वर, गंगाद्वार येथून ‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमा अंतर्गत अमृत महोत्सव नदी यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गोव्याचे लोकायुक्त व माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी, नमामि गोदा फाऊंडेशनचे सदस्य आणि या उपक्रमाचे ब्रँड अंबेसिडर अभिनेते चिन्मय उदगीरकर, नदीला जाणूया उपक्रमाचे राज्य समितीचे अशासकीय सदस्य राजेश पंडित, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, जलबिरादरीचे विनोद बोधनकर, नरेंद्र चुग, स्मार्ट सिटीचे पी. बर्डे, गणेश भोळे, सरपंच जगन झोले, वन अधिकारी गणेशराव झोले, सत्संग फाउंडेशनच्या एम. वसुकी, रात्रीचा खेळ चाले कार्यक्रमातील फ्रेम अभिनेत्री स्वाती लिमये आदींसह विविध प्रमुख मान्यवरांचे सहकार्य आहे.
या कार्यक्रमामध्ये गोदावरीच्या उपनद्यांवर काम करणार्या गोदासेवकांना कलश देत या कार्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी नंदिनी, वालदेवी, कपिला, वरुणा, मोती, अगस्ती, माळुंगी या नद्यांवर काम करणार्या गोदासेवकांच्या तसेच वरुणा नदी (वाघाडी) यांच्या टीमला देखील कलश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी पंचवटी-म्हसरूळ वरूणा नदी संवर्धन समितीच्या वतीने सुनील परदेशी, प्रकाश उखाडे, राहुल जोरे, विरेंद्रसिंग टिळे, सुभाष कापडी, अब्बासभाई हुसेनी आदी सर्वजण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते किरण भालेराव यांनी केले. तसेच गोदावरी नदीच्या पवित्र रामकुंडावर सर्व गोदाप्रेमींच्या हस्ते आरती देखील करण्यात आली. वरुणानदी संवर्धन समितीच्या सोबतच सहभागी संस्था यूथ राष्ट्रीय युवाशक्ती, पोलीस मित्र परिवार संघ, मैत्रजीवाचे फाऊंडेशन, आम्ही सेवेकरी ग्रुप, नावनाथपंढी सामाजिक संस्था,जय शिवशंकर मित्र मंडळाचे पदाधिकारी व गोदाप्रेमी नागरिक उपस्थित होते.
नागरिकांचे सांडपाणी, कचरा यामुळे गोदावरी नदीची प्रमुख उपनदी असणारी नंदिनी नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. या प्रदूषणामुळे नदीला नासर्डी नाल्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न गंभीर झाल्याने नंदिनी नदीला प्रदूषणमुक्त करण्याची मागणी निसर्गसेवक युवामंचकडून मुख्यमंत्र्यांकडे इ-मेलद्वारे करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम