नाशिक – जिल्ह्यात सध्या सर्वत्र अतिवृष्टी सुरु आहे, त्यामुळे काही पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत असल्याने अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून वनविभागाने खबरदारी म्हणून या पर्यटनस्थळांवरील प्रवेश बंद केला आहे.
नाशिक पश्चिम विभागाच्या अधिनस्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने, दुगारवाडी, हरीहर, भास्करगड, अंजनेरी, वाघेरा तसेच इगतपुरी तालुक्यातील भावली, त्रिंगलवाडी, कुरुंगवाडी आदी सर्व पर्यटनस्थळे आणि गडांवर आजपासून पुढील आदेश मिळेपर्यंत प्रवेश बंद करण्यात आले आहेत. ह्या गडांवर किंवा पर्यटनस्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न नागरीकांनी करु नये, अन्यथा संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत नागरिकांनी नोंद घ्यावी आणि आदेशाचे काटेकोरपणे पालन करुन वनविभागास सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून याचे तंतोतंत पालन करण्यात येणार आहे.
नाशिक जिल्हा व आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून, नागरीकांना व पर्यटनप्रेमींना पर्यटनक्षेत्रास भेट देण्याचा मोह अनावर होणे साहजिकच आहे. या दिवसात अनेक जण गड-किल्ले सर करायला जातात, ट्रेकिंगला जातात, तर काही धबधब्यात भिजायला जातात पावसाळा म्हणजे जणू पिकनिक जाम मौसमच असतो. त्यामुळे या दिवसातच मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत अनेक फिरायेच प्लॅन बनतात. मात्र होणारे अपघात या आनंदात विर्जन टाकण्याचे काम करतात, तेच टाळण्याचा प्रयत्न पर्यटन विभागाकडून करण्यात येत आहे.
पावसाळ्यात सर्वाधिक गर्दी नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर होत असते. मात्र याच पावसाळ्यात पाऊस, चिखल यामुळे अपघातांचा धोका जास्त असतो, तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनादेखील घडत असतात. त्यामुळे आता पर्यटन विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवेशबंदीचा आदेश वनविभागाकडून काढण्यात आलेला आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी या आदेशाची पालन करणे आवश्यक आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम