नाशिक: नाशिक मुंबई रस्त्याची चाळण झाल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत होता. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली होती. यावर तातडीचा तोडगा काढण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी केली. यानुसार गेल्या आठवड्यात डागडुजीचे काम हाती घेतले असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नाशिक मुंबई हायवेवर वडपे ते ठाणे यादरम्यान वारंवार वाहतूक ठप्प होत असल्याने नाशिकहून मुंबईत पोचण्यासाठी तब्बल चार ते पाच तास लागत असल्याचा प्रवाशांच्या तक्रारी येत होत्या, या पार्श्वभूमीवर नाशिककरांसह भिवंडी, कल्याण व ठाणे येथील नागरिक, उद्योग व व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना सांगितल्या. मंत्री भुसे यांनी स्वतः पाहणी करून वेळोवेळी पाठपुरावा केल्याने तूर्तास डागडुजीचे काम हे अंतिम टप्प्यात असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने महामार्गाचे काम सुरू असून दोन दिवसात काम पूर्ण होईल. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या किरकोळ बाबींचा निपटारा करण्यात आला आहे. कट देखील बंद केले आहेत. वाहतूक कोंडी आताच्या घडीला होणार नाही याची परिपूर्ण काळजी घेतली आहे. अधिकाऱ्यांना तंबी दिली असून कुठल्याही प्रकारची कोंडी यापुढे रस्त्यावर दिसणार नाही यासाठी उपाययोजना सुरू आहेत. तसेच ट्रॅफिक पोलिस व वॉर्डन यांना देखील सूचना केल्या आहेत.
– दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम