नाशिक : शहरात शनिवारी पहाटे झालेल्या बस दुर्घटनेत आतापर्यंत ९ मृतदेहांची ओळख पटली असून उर्वरित तिघांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवली जाणार असल्याचे जिल्हा रूग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
काल मिरची हॉटेल सिग्नलजवळ चिंतामणी ट्रॅव्हल कंपनीची बस एका ट्रकला धडकली होती. ज्यामुळे सदर ट्रकच्या डीझेल टाकीचा स्फोट होऊन भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत एकूण १२ जणांचा मृत्यू झाला होता. तर ३१ जण जखमी झाले होते.
आतापर्यंत ह्या दुर्घटनेतील ९ मृतदेहांची ओळख पटली असून, जिल्हा रुग्णालयाने त्यांची नवे जाहीर केली आहे. तर उर्वरित तीन मृतदेहांची ओळख पटत नसल्याने त्यांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी तशी सूचना रुग्णालय प्रशासनाला केली होती.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार एकूण ९ जणांची ओळख पटली असून त्यातील तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर, उर्वरित सहा जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक आले नसून जिल्हा प्रशासन त्यांच्याशी संपर्क साधून मृतदेह ताब्यात देण्याची प्रक्रियेत आहे. सध्या उर्वरित तिघा मृतदेहांची डीएनए चाचणी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याद्वारे मृतांची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम