Trambkeshwar : धार्मिकता आणि संस्कृतीचा वारसा लाभलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने या ठिकाणी सर्वहारा परिवर्तन केंद्र आहे. ही एक खासगी संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून एक वसतिगृह चालवले जाते. याच वसतिगृहातील अल्पवयीन मुलींना संस्था चालकाच्या मालकीच्या असलेल्या एका खाजगी रिसॉर्ट मध्ये नाचवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आदिवासी मुलींना पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचण्यास सांगितले जात असल्याची तक्रार पालकांनी वाडीवरहे पोलिसांकडे केल्याने खळबळ उडाली आहे.
सर्वहारा संस्था आणि रिसॉर्ट एकच मालकाचे असल्याची चर्चा या भागात असून या प्रकारामुळे पालकांनी केलेल्या तक्रारी नुसार संस्थेचे चालक आणि शिक्षकांच्या विरुद्ध वाडीवऱ्हे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पहिने येथे एका खासगी संस्थेची काही वर्षांपासून कायमस्वरूपी विना अनुदानित इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा आहे. या शाळेला जोडून यंदा मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले. शाळा सुरू होण्यास पंधरा दिवसांचा अवधी असताना वसतिगृहात सातवी ते नववीच्या विद्यार्थिनींना ३१ मे २०२३ पासूनच प्रवेश देण्यात आला. सुटीत मुलींना पारंपरिक नृत्य व संगणक शिक्षण दिले जाणार असल्याचे संस्थेने सांगितले होते. प्रत्यक्षात संगणक शिक्षण दिले नसल्याचा आरोप मुलींनी केला आहे तर येणाऱ्या पर्यटकांसमोर आपल्याला नृत्य करायला सांगण्यात येत असल्याचे देखील मुलींनी सांगितलं आहे. संस्थेची सहावीपर्यंतच शाळा असल्याने या मुलींना त्र्यंबकेश्वर येथील शाळेत शिक्षणासाठी पाठविले जाते. पालकांनी मुलींसाठी प्रत्येकी ३,५००
रुपये अनामत रक्कम जमा केली. या संस्थेच्याशाळेमागील टेकडीवर हॉटेल असून, तेथे मे महिन्याच्या अखेरीस काजवे पाहण्यासाठी पर्यटक येतात. त्यांच्यासमोर सायंकाळी सहा ते रात्री नऊ दरम्यान नाचण्यास सांगितले जाते. नाचले नाही तरी शिक्षिका संस्थाचालकांच्या सांगण्यावरून दमदाटी करतात व छड्या मारतात, अशी तक्रार मुलींनी पालकांकडे केली. त्यानंतर पालकांनी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या मुलींना आता दुसऱ्या शाळेत दाखल केल्याचे पालकांनी सांगितले आहे. मात्र घडलेला हा प्रकार अतिशय संताप जनक आणि धक्कादायक असल्याने या संस्थाचालकांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे. तर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये घडलेला हा प्रकार अतिशय संताप जनक असून यामुळे याकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे आणि होत असलेले हे गैरकृत्य थांबवावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम