द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : महाबली हनुमंताच्या जन्मस्थळावरून सुरू असलेला वाद अद्याप देखील थांबलेला नाही. हनुमंताचे जन्मस्थळ ठरवण्यासाठी नाशिकमध्ये मंगळवारी शास्त्रार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र या सभेत उपस्थित साधू-महंतांमध्येच मोठा राडा झाला.
नाशिकच्या अंजनेरी येथे हनुमंताचा जन्म झाल्याची श्रद्धा आहे. मात्र किष्किंधा येथील महंत विष्णुदास यांनी हनुमंताचा जन्म हा अंजनेरी येथे नसून, किष्किंधा येथे झाला असल्याचे म्हटले आहे. आणि त्यांनी नाशिकच्या महंतांना हनुमंताचा जन्म अंजनेरी येथे झाल्याचे सिद्ध करण्याचे आवाहन केले.
नाशिकमध्ये मंगळवारी याबाबत महंतांची शास्त्रार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र या सभेत सारे हमरी-तुमरीवर उतरले आणि सारा गोंधळ उडाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने, पुढील वादंग टळला.
किष्किंधा येथील महंतांनी केलेल्या या आवाहणामुळे नाशिकमधील महंत आक्रमक झाले आहेत. यावरून त्यांच्याद्वारे नुकतेच आंदोलन करण्यात आले होते. हनुमंताच्या जन्मस्थळावरून सुरू झालेला हा महंतांमधील वाद कधी संपणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम