नाशिक : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकींची धूम सुरू असून, या काळात कधी काय होईल..? हे काहीच सांगता येत नाही. दरम्यान, असाच एक अनपेक्षित प्रसंग आज दिंडोरी लोकसभा मतदार संघात बघायला मिळाला. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकसह दिंडोरी लोकसभा मतदार संघ काही ना काही कारणांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, आज हा मतदारसंघ दीर आणि भावजय यांच्या भेटीमुळे चर्चेत आला आहे.
ते घडलं असं की, दिंडोरी लोकसभेच्या विद्यमान खासदार आणि भाजप उमेदवार केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार आणि कळवण तालुक्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांनी आज अनेक दिवसांपासूनचे त्यांचे कौटुंबिक आणि राजकीय वैर संपवले असून, मोठेपणा घेत भारती पवारांनी आज त्यांच्या सासूबाई आणि पती प्रवीण पवार यांच्यासह नितीन पवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. (Dindori Loksabha)
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून, एक तपानंतर एकत्र आलेल्या या कुटुंबासाठी हा क्षण काहीसा भावुक होता. भारती पवार आणि त्यांच्या जाऊबाई जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांचे गेली अनेक वर्ष राजकीय आणि कौटुंबिक मतभेद आहेत. या मतभेदाचा त्यांच्या राजकीय कारकीर्दीवरही वेळोवेळी परिणाम झालेला आहे. व्यक्तिगत मतभेदांमुळे पवार कुटुंब प्रदीर्घ काळापासून एकत्र आलेले नव्हते.(Dindori Loksabha)
Dindori Loksabha | दिंडोरीत आघाडीत बिघाडी; गावितांचा शरद पवारांना थेट इशारा
Dindori Loksabha | दीराला सोबत घेणे घडीची गरज
दरम्यान, आता दीर आणि भावजय हे दोघेही महायुतीचा भाग आहेत. त्यामुळे जिथे युतीधर्माच्या आडून मोठे मोठे वैर शमले. तिथे हा कौटुंबिक वाद कायच… भारती पवारांना मतदार संघात आणि त्यांच्याच पक्षात होणारा विरोध पाहता त्यांना दीराला सोबत घेणे ही आजच्या घडीची गरज होती. एका तपानंतर दोन्ही जावांची भेट झाली आणि यावेळी त्यांनी गळाभेट घेतली असता दोघींचेही डोळे पाणावले. तसेच यावेळी आमदार नितीन पवारांच्या आई आणि भारती पवार यांच्या सासू शकुंतला पवार या जावाही भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. (Dindori Loksabha)
राजकीय हेतुसाठी हा टायमिंग साधला..?
आपल्या राजकीय हेतुसाठी हा टायमिंग साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू असून, असे असले तरीही त्यांच्या या निर्णयामुळे कळवण विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र पालटणार यात शंकाच नाही. दरम्यान, आता परस्पर विरोधक असलेले दीर भावजय एकत्र आल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना याचा फटका बसणार का..? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Bharti Pawar | भारती पवारांची सभा उधळली..?; कांदा उत्पादकांसह गावकरी आक्रमक
कोण काय म्हणाले..?
“हा कौटुंबिक विसंवाद असून, आज हा वाद पूर्णपणे संपला आहे. त्यामुळे आता आम्ही निवडणुकीत एकत्र येऊन निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन करणार असल्याची ग्वाही आमदार नितीन पवार यांनी दिली. तर, “आमच्यात केवळ दुरावा होता आणि तो आता संपला आहे. भाजपचा यंदा ४०० पारचा नारा असून, त्या अनुषंगाने आज आमची भेट झाली आहे. येत्या निवडणुकीमध्ये पवार कुटुंब एकत्र आल्यामुळे मतदार संघातील राजकीय वातावरण बदलण्यास याची मदत होईल,’ असे स्पष्टीकरण डॉ. भारती पवार यांनी दिले. (Dindori Loksabha)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम