नाशिक : केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) व यांसारख्या अनेक संघटनांवर बंदी घातली आहे. या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले असून देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना या देशात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. पंचवटी येथील श्री स्वामीनारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. पीएफआय सारख्या संघटना ह्या देशासाठी धोकादायक असून अशा लोकांचा चोख बंदोबस्त केला गेला पाहिजे, असे म्हणत त्यांनी ही बंदी योग्य असल्याचे म्हटले आहे. तसेच, केंद्र आणि राज्याचे गृहखाते चांगले काम करत असून अश्या राष्ट्रविरोधी विचार पसरवणाऱ्यांविरोधात कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.
“स्वामी नारायणजींच्या आशीर्वादामुळे मी आज मुख्यमंत्री”
यावेळी शिंदेंनी आपल्या मुख्यमंत्री बनण्यामागे मोदी-शाहचा हात नसल्याचा खुलासा करत राज्याचा मुख्यमंत्री होण्यामागे आपल्यावर स्वामी नारायणजींचा आशीर्वाद असल्याचे म्हणाले आहे. तशी एक आठवण काढत सांगितले, की मी ११ नोव्हेंबर २०१७ ला येथे आलो होतो, त्यावेळी या मंदिराचे भूमीपूजन झाले होते. त्यानंतर आज याच ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली आहे. हे माझे भाग्य असून मी मुख्यमंत्री झालो, हा स्वामी नारायणजींचा आशीर्वाद आहे, असे ते म्हणाले.
जे लोकांना वाटते, तेच आम्ही करणार
यावेळी त्यांनी राज्यात सर्वसामान्य लोकांचे सरकार स्थापन झाले आहे. सर्वांना घेऊन पुढे जाईल आणि सर्वांचा सर्वांगीण निर्णय होईल, असे आश्वासन दिले. तसेच सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही, कोणाला काय वाटेल ते करणार नाही. जे लोकांना वाटते तेच आम्ही करणार, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ यांना टोला लगावला. तर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत शिवसेनेला सामावून घेण्याच्या विचारावर प्रश्न विचारताच त्यांनी मी नंतर नक्की उत्तर देईल, असे स्मितहास्य करून म्हणत हा प्रश्न टाळला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम