नाशिक प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आधीच संकटात असतांना, थकबाकीमुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने ओढून आणलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव 4 फेब्रुवारी रोजी होणार आहे, यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून नियोजित शेतकरी वाहनांची लिलाव प्रकिया हाणून पाडणार असल्याचा इशारा शेतकरी संघर्ष संघटना प्रदेश कार्यकारी अध्यक्ष नानासाहेब बच्छाव यांनी दिला आहे. यामुळे या लिलाव प्रक्रियेला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संघटनेचे बच्छाव म्हणाले, नुकतेच अनेक बड्या धेंडांनी जिल्हा बँकेत घोटाळे केलेले आहेत. सहकार विभागाने त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केलेली असताना ती वसुली न करता ? सामान्य शेतकरी अगोदरच अडचणीत असताना करोनात जगाला जगवणाऱ्या शेतकऱ्याला जिल्हा बँक सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. हे थांबले पाहिजे अन्यथा याचे वाईट परिणाम बँकेला भोगावे लागतील असा इशारा बच्छाव यांनी दिला.
शेतकरी अडचणीत असल्याने मागच्या 2/3 वर्षात करोना आणि नैसर्गिक अडचणींमुळे बँकेची थकबाकी भरू शकलेला नाही. परंतु शेतकरी कर्ज भरण्याच्या मानसिकतेत असतानाच कुठलीही सवलत न देता थेट लिलाव करण्याचा प्रयत्न म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस भाग पाडण्याचे काम बँक प्रशासन करत आहे. याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
हा लिलाव वादळी ठरण्याची शक्यता निर्माण झाली असून, राज्यभर करोनाचे निर्बंध असताना तुमचा पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांना दडपण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा नाना बच्छाव यांनी दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम