Baglan : हिंदू धर्मीय आणि वारकरी संप्रदायाचा पवित्र सण असलेल्या आषाढी एकादशीच्या दिवशीच यंदा बकरी ईदचा सण साजरा होत असून या दिवशी प्राणी हत्या टाळून कुर्बानी देऊ नये, तसेच सटाणा शहर व बागलाण तालुक्यातील सर्व कत्तलखाने बंद ठेवावीत, असे आवाहन बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी सर्व मुस्लिम बांधवांना केले आहे.
याबाबत माजी आमदार सौ.चव्हाण यांनी शहर व तालुक्यातील सर्व मुस्लिम पंच प्रमुखांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, येत्या गुरुवार दि.२९ जुन रोजी आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठलाची श्री क्षेत्र पंढरपूरसह संपुर्ण जगभरात महापूजा केली जाणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वारकरी या दिवशी पंढरपूर येथे जावून आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेवून जीवनाचे सार्थक झाल्याचे मानतात.
आषाढी एकादशी हिंदू धर्मियांचा अत्यंत पवित्र दिवस आहे. यंदा याच दिवशी बकरी ईदचा सण सुद्धा साजरा केला जाणार असल्याने या दिवशी सटाणा शहर ब बागलाण तालुक्यातील सर्व कत्तलखाने बंद ठेवावीत तसेच या दिवशी कोणत्याही मुक्या जनावरांचा बळी देवून कुर्बानी दिली जाऊ नये, अशी भावना सर्व हिंदू धर्मीय, वारकरी संप्रदायातील जनता व भाविकांची आहे. सटाणा शहर व बागलाण तालुक्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये दोन्ही धर्मातील सणांच्या माध्यमातून नेहमी सोहार्दाचे वातावरण असावे, एकमेकांच्या धर्माबाबत आदर, प्रेम, जिव्हाळा असावा,असे सर्व धर्मीयांना वाटते. सर्वधर्मसमभाव हा आपल्या संविधानाचा पाया आहे. तो मजबूत राहावा यासाठी प्रत्येक भारतीयाने तसेच सर्व धर्मातील लोकांनी त्याचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
आपापल्या धर्माचा प्रत्येकाला अभिमान जरूर असावा, मात्र समाजविघातक कृत्य करणार्या अपप्रवृत्तींना सुद्धा प्रतिबंध करणे आपले कर्तव्य आहे. यामध्ये सर्वांचे हित आहे. त्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त प्राणीहत्या टाळून कुर्बानी देऊ नये आणि सटाणा शहर व बागलाण तालुक्यातील सर्व कत्तलखाने बंद ठेवावीत, अशी आग्रही मागणीही माजी आमदार सौ.चव्हाण यांनी निवेदनात केली आहे. निवेदनाच्या प्रती बागलाणचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पालिकेचे मुख्याधिकारी व पोलिस निरीक्षकांना दिल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम