राम शिंदे | इगतपुरी: मरावे परी कीर्ती रुपी उरावे या पंक्तीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कै. माधवराव गोपाळा साबळे होय, इगतपुरी तालुक्यातील अडसरे बु गावात १५ जून १९२८ ला कै माधवराव यांचा अडसरे येथील साबळे कुटुंबियात जन्म झाला. लहान पण अगदी शेत शिवारात आई वडिलांसोबत गेलं त्यानंतर प्राथमिक शिक्षण घेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इयत्ता सातवी पर्यंत त्यांनी कसे बसे आपले शिक्षण पूर्ण केलं.आपल्या सोबत आपल्या दोन भावांचेही शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.
शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक चळवळ उभं करणं हे माणसाच्या रक्तातच असावं लागतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कै. माधवराव गोपाळा साबळे, साबळे कुटुंबासोबतच इतर नातेवाईक, नातलगांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून स्थीरस्थावर करुन आपल्या आचार विचार, संस्काराने, कणखर नेतृत्वाने वटवृक्षासम खंबीरपणे सर्वांच्या पाठीशी उभे राहुन अनेक प्रसंग लीलया पेलणारे आधारवड म्हणजे कै. माधवराव गोपाळा साबळे होय.प्रथम त्यांच्या समाजकार्याची सुरुवात त्यांनी लोकनाट्ये,भजनी मंडळे आणि कीर्तने या माध्यमातून नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी नाशिक,त्र्यंबकेश्वर भागात केली.
या कामाला कायम स्वरूप देण्यासाठी त्यांनी इगतपुरी येथे जोग महाराज भजनी मठाची स्थापना केली. यासाठी त्यांनी वारकरी शिक्षण संस्था सुरू केली. ज्ञानेश्वरीचे पारायण, कीर्तने, प्रवचने, गायन, मृदंगवादन, यासाठी संत पिठाचे वारकरी संप्रदायाचे शिक्षण देऊन जनजागृती साठी त्यांनी सात्विक वृत्तीचे भाविक कार्यकर्ते तयार केले.
आदिवासींच्या शैक्षणिक उन्नतीसाठी टाकेद, वासाळी अडसरे येथे पहिल्यांदा माध्यमिक विद्यालये सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेत शाळा सुरू केल्या,नाशिक जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांशी ते शेवटपर्यंत संबंधित राहिले. त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून सण १९८८/८९ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना आदिवासी सेवक राज्य पुरस्कार देऊन सन्मानित केले.
आपल्या आदिवासी समाजाची आताची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारलेली आहे परंतु बहुतेक जण अजुनही सुधारणेपासुन वंचितच आहेत. तर कै माधवराव साबळे यांच्या लहानपणीची परिस्थिती काय असेल याचा अंदाज आपल्याला नक्की येईल. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कै माधवराव साबळे यांचे इ.७ वी पर्यत शिक्षण पूर्ण झाले.एक वेळेस तलाठी,एक वेळ ग्रामसेवक तर ग्रामपंचायत सेक्रेटरी म्हणून त्यांनी त्याकाळी गाव परिसरात काम बघितले,पेठे विद्यालय नाशिक येथील शेवटच्या परिक्षेच्या शेवटच्या पेपरच्या वेळेस कै साबळे यांच्या व्यतिरिक्त इतर मुलांनी शाईची दौत व टाक मोडुन साजरा केलेला आनंदाची आठवण कै माधवराव साबळे यांच्याकडून ऐकवयास कायम मिळायची. राजकीय सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बघता त्यांना त्याकाळी भाजप, काँग्रेस या पक्ष्यांकडून थेट आमदारकी चे तिकीट देखील मिळाली परंतु त्यांनी ते तिकीट त्यांचे जावई माजी आमदार यादवराव आनंदराव बांबळे यांना मोठ्या मनाने दिलीत आणि त्यांना निवडूनही आणले.
सलग पाच वेळा सर्वाधिक पंचवीस वर्षे गावच्या सरपंच पदाचा भार प्रामाणिक व निष्ठेने सांभाळून त्यांनी आपल्या विकास कामाच्या जोरावर मजल दरमजल करत इगतपुरी पंचायत समिती सभापती ,उपसभापती पदापर्यंत मजल मारली. या पदापेक्षाही कै साबळे यांनी जनसामान्यांच्या मनापर्यंतची मजल फार मोठी होती.राजकीय क्षेत्रात काम करत असतांना त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे,प्रमोद महाजन अश्या दिग्गज राजकारणी व्यक्तींशी दिल्ली दौरा देखील केला. हिई घरगुती भांडणे व इतर आर्थिक, सामाजिक, वैचारिक अडचणीचा गुंता सोडवण्यासाठीही पंचक्रोशीतुन लोक, समाज मोठय़ा आशेने कै साबळे यांच्याकडे येत असत… त्या सर्वांना माधवराव यांनी कधीच नाराज केले नाही. फुल नाहीतर फुलाच्या पाकळीची तरी मदत माधवराव नक्की करत असत.
इगतपुरी, अकोले, त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील आदिवासी बहुल भागात समाजाच्या प्रगतीसाठी बाबांचे मोठे काम आहे… ज्या ठिकाणी बाबांनी काम केले त्या ठिकाणी शासन स्तरावर बाबांच्या कामाची प्रशंसा होत असे.अकोला डेपोची पहिली बस व लाईट टाकेद अडसरे भागात पहिल्यांदा त्यांनी आणली. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात अत्यंत तळमळीने अभिनव उपक्रम राबविण्यात माधवराव यांचा हातखंडा होता. गावोगाव भजनी मंडळांचा विस्तार, वारकरी संप्रदायाचा प्रसार, इगतपुरी चा जोग महाराजाचा मठ या सर्वांच्याच स्थापनेपासून प्रसारापर्यंत अमुल्य योगदान त्यांनी दिले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रा मिठाचा सत्याग्रह यात सहभाग देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी मा.आमदार विठ्ठल गणपत घारे ,मा.आमदार यादवराव आनंदराव बांबळे,मा.आमदार शिवराम शंकर झोले यांच्या सोबत त्यांनी अनेक काळ समाजकारणात काम केले.
तासनतास घरी देखील ते आपले काम करत असायचे… आताच्या उतार वयातही त्यांचे वाचन अद्याप सुटलेले नव्हते. एखादा अभंग, काव्यपंक्ती आवडलीच तर ती एका वहीच्या पानावर लिहुन काढल्याशिवाय ते राहवत नव्हते… काही वर्षे उपसभापती म्हणुन देखील तालुकास्तरावर अत्यंत चोखपणे काम केले. समाजसेवे बरोबरच घराकडेही त्यांनी तितकेच लक्ष दिले. मुलीना कमी शिकवणाऱ्या आपल्या समाजात शिक्षणाचे महत्त्व माहित असलेल्या बाबांनी मुलांमुली मध्ये कधीही भेद केला नाही. प्रयत्ने वाळुचे कण रगडीता तेल ही गळे व अपयश ही यशाची पहिली पायरी आहे* या दोन उक्तीप्रमाणे नापास झाले तरी पुन्हा पुन्हा शिक्षण चालु ठेवण्याकरिता कायमच प्रेरणा ते देत आले.
कुटुंबियांवर असलेले प्रेम जिव्हाळा एकनिष्ठ राहून समविचारांनी केलं अश्या या कुटुंबियांचत पन्नास कुटुंब सभासद आहेत संप्रदायिक पद्धतीने संस्कार मार्गदर्शन मिळाले गावात धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमाला त्यांच्याकडून सुरुवात झाली. बहुतेक मामा, मावश्या व नातवंडाची अॅडमिशन, दाखले, शिष्यवृत्ती इ. कागदपत्रे स्वतः त्यांनी शाळा/ कॉलेज मधे जमा केली आहेत. गावोगावी शिक्षणाची ज्ञानगंगा व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले. अडसरेतील शाळेच्या स्थापनेसाठी ही त्यांनी निस्वार्थी भुमिकेतुन शाळेच्या प्रशासकीय मंडळावर मोलाची भुमिका बजावली. समाजाप्रती निस्वार्थी भावनेने केलेल्या कामाची शासनामार्फत ही वेळोवेळी दखल घेण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने त्यांचा आदिवासी समाजाच्या सेवेच्या कामाचा गौरव म्हणून सन १९८८-८९ रोजीचा आदिवासी सेवक पुरस्कार त्यांना जाहिर केला. पुरस्कारासोबत प्रमाणपत्र व आजन्म एसटी महामंडळाचा मोफत पास (स्वतः + एक व्यक्ति) त्यांना देण्यात आला. या पासचा सदुपयोग करत त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर त्यांच्या कामाचा विस्तार वाढविला… त्या वेळेस ते घरात कमी भ्रंमतीवरच जास्त असत.
शिक्षणासोबतच त्यांच्या सर्व नातवंडाना चांगले आचार विचार, प्राण्याविषयी प्रेम (भुतदया) आणि चांगले संस्काराचे धडे बालपणीच मिळत गेले. आजही दरवर्षीप्रमाणे श्रावणात भाताचा एक कट्टा अंगणात रोज बाबाकडुन चिमण्यांना अन्न म्हणुन टाकण्याचे काम चालुच आहे.
गावातील लोकांमध्ये एकता व सलोख्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत सामाजिक एकता प्रस्तापीत व्हावी यासाठी विशेष योगदान देत असतात. गावातील सप्ताहातील कार्यक्रमात चांगले कीर्तनकार उपलब्ध व्हावे यासाठी ते प्रयत्नशील असत. स्वभावाने जरी कडक शिस्तीने वागत असले तरी बाबांचा आंतरीक स्वभाव मात्र अत्यंत मृदू आहे. जे लोक त्यांच्या संपर्कात आहेत त्यांनी हा अनुभव घेतला आहे. आपल्या समाजासाठी काम केलेल्या प्रतिष्ठित व्यक्ति डॉ. गोविंद गारे व इतरही पंचक्रोशीतील आमदारांच्या मुखात आजही नाव येतच असते.
डॉ. गोविंद गारेच्या साहित्यात ही माधवराव साबळे यांच्या कार्याचा उल्लेख आढळुन येतो. कित्येक वेळा त्यांच्याकडून डॉ. गोविंद गारेच्या भेटीगाठीच्या आठवणीना त्यांनी उजाळा दिलेला आहे. कायम समाजसेवेसाठी धडपडणाऱ्या साबळे यांनी नातवंडांचेही फार लाड केले आहेत… दरवर्षी उन्हाळा व दिवाळीच्या सुट्टीत त्यांच्या अंगणात बालगोपाळांचा गोतावळा भरलेला असायचा. खाऊ, खेळणी व फटाके इ. ची ते जातीने काळजी घेत. नित्यनेमाने आंघोळ झाली का गंध लावत असत. लहानपणी नातवंडांची अंघोळ झाली की साबळे यांच्यासमोर गंध लावण्यासाठी बसत असत मग ते सर्वांना ओळीने गंध लावायचे तो कपाळी लावलेला गंध म्हणजे त्यांच्या नातवंडांसाठी एखादा पुरस्कार भेटल्यासारखा प्रसंग वाटत असे.bआज ही सर्व भावंडांच्या मनाच्या गाभाऱ्यात त्यांनी खोगदाकडे आंब्याखाली सर्व नातवंडाची वनभोजनासाठी नेलेली ट्रीप कुटुंबियांच्या काळजात घर करुन आहे.
आजपर्यत उतार वयात ही कै साबळे यांनी आपली नित्यकर्मे आजतागायत कधी चुकू दिली नाहीत. उतार वय झाले असले तरी काम करण्याची तीच तळमळ कायम होती.त्यांच्या छत्रछायेखाली सर्व नातवंडे लहानाचे मोठे झाले. जडणघडणीमध्ये मोठे माधवराव साबळे यांचा सिंहांचा वाटा होता. अश्या या सामाजिक शैक्षणिक चळवळीतील आदिवासी सेवकाचा व सर्व गाव परिसरातील वडिलांच्या जागेवर स्थान असलेल्या व्यक्तीचा ०१/०१/२०२२ रोजी स्वर्गवास झाला. एक शांत संयंमी, निस्वार्थी स्वावलंबी प्रयत्नवादी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेली.
एक आदर्श निर्व्यसनी कुटुंब म्हणून त्यांच्या कुटुंबाकडे बघितले जाते,आज त्यांच्या पश्चात दोन भाऊ,मुले, पुतणे, सुना,नातवंडे, पतवंडे, असा परिवार आहे यापैकी
एक बहीण चंद्रभागा बाळकृष्ण जाधव अमेरिकेत परिवारासह आहे., रमेश माधवराव साबळे जव्हार मोखाडा माध्यमिक आश्रम शाळा याठिकाणी शिक्षक आहे, कृष्णा माधवराव साबळे हे शिक्षक आहेत, नातू पुरुषोत्तम रामदास साबळे लातूर याठिकाणी शाहू कॉलेजवर प्राध्यापक आहे,तर दुसरा नातू उद्धव रामदास साबळे भरवीर याठिकाणी शिक्षक आहे,पुतणे रोहिदास दगडू साबळे जोंधळे हायस्कूल मुंब्रा याठिकाणी शिक्षक,गुणाजी बिपीन साबळे पुतण्या के टी एच एम कॉलेज नाशिक येथे प्राध्यापक, तर नात संगीता भांगरे या BDO आहेत, नातू अमोल लक्ष्मन भांगरे अभियंता व नातू शाम अशोक साबळे हे शिंदे पळसे येथे शिक्षक आहेत.असा जवळपास पन्नास सभासद असणाऱ्या कुटुंबियांतील आधारवड कै.माधवराव गोपाळा साबळे यांचे दुःखद निधन झाले. आजच्या त्यांच्या दशक्रियाविधी च्या दिवशी त्यांना सर्व आदिवासी समाज बांधवांकडून भावपूर्ण आदरांजली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम