संपूर्ण मराठा समाजाची अस्मिता असलेल्या नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत अखेर “दादा” गिरी व बेबंद हिटलरशाही मोडीत काढत सुज्ञ सभासदांनी परिवर्तनाचा इतिहास घडवला. कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि संयमाच्या बळावर नितीनजी ठाकरे यांच्या ठाकरे पर्वाचा उदय झाला.
भगवान के घर देर है लेकीन अंधेर नही या उक्तीप्रमाणे नितीनजी ठाकरे साहेबांच्या १५ वर्षांच्या अविरत संघर्षाला अखेर निर्भेळ यश आले. मात्र परिवर्तन पॅनलचे लढाऊ शिलेदार व सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अल्पमतांच्या दुर्दैवी पराभवाचा अपवाद वगळता सर्वच उमेदवार नितीनजींच्या ठाकरे लाटेत प्रचंड मताधिक्य घेत विजयी झाले.
नितीनजी ठाकरे यांनी तर नीलिमाताई पवार यांना तब्बल १२६१ मतांनी धोबीपछाड देत सरचिटणीस पद काबीज करत ठाकरे पर्वाचा आरंभ केला. आदरणीय नितीनजी ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांच्या आदर्श विचारांचा वारसा अंगिकारत केलेली सुयोग्य पॅनल निर्मिती, सूत्रबद्घ सूक्ष्म नियोजन, प्रभावी प्रचारयंत्रणा, मविप्रच्या सर्वच सभासदांशी १५ वर्षापासून जुळलेली नाळ व त्याला जिल्हाभरातील मविप्र हितचिंतक व कार्यकर्त्यांची लाभलेली खंबीर साथ यामुळे मविप्रचा परिवर्तनाचा इतिहास घडविला. निफाडचे भूमिपुत्र, नवनिर्वाचित सभापती बाळासाहेब (आप्पा) क्षिरसागर व सर्वच उमेदवारांच्या कठोर परिश्रमामुळे निफाड तालुक्यातील सुज्ञ सभासद बांधवही नितीनजी ठाकरे यांच्या परिवर्तनाचे साक्षीदार झाले.
निफाडसह इतर सर्वच तालुक्यांनी परीवर्तन पॅनलला विक्रमी आघाडी देत मविप्रच्या हिटलरशाही कारभारावर शिक्कामोर्तब केले. मविप्रचे थोर कर्मवीर बाबुराव ठाकरे यांच्या आदर्श विचारांचा वारसा घेवून सरचिटणीसपदी विराजमान झालेले नितीनजी ठाकरे साहेब नक्कीच भविष्यात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेला वेगळ्या उंचीवर नेवून मायबाप सभासदांचा विश्वास सार्थ ठरवतील यात मला शंकाच नाही.!
मविप्र संस्थेतील १२ वर्षातील सत्ताबाह्य कुटुंबकेंद्रीत मनमानीला विटलेल्या सभासदांचा उद्रेक उफाळून आला. तसेच सभासदांनी भ्रष्ट मार्गाच्या लक्ष्मीदर्शनाला न भुलता सदसदविवेकबुद्धीने मताचे दान ठाकरे साहेबांना दिल्याने न भूतो न भविष्यती इतिहास घडवला आहे. संस्थेच्या हिताच्या निर्धाराने नितीनजी ठाकरे यांच्या प्रचारात सक्रिय असणाऱ्या आमच्यासारख्या असंख्य बिगर सभासद असलेल्या कार्यकर्त्यांना सतत हिनवणाऱ्या लाभार्थी बगलबच्चांना मात्र या धक्कादायक निकालाने जबरदस्त चपराक लगावली आहे.
असो..! राजकारणात जय-पराजय सुरूच असतो. त्यामूळे यशाने हुरळून न जाता आता अधिक जबाबदारीने मविप्रच्या नव्या शिलेदारांना सभासदांच्या अपेक्षापूर्तीचे ओझे पेलावे लागणार आहे. त्याचप्रमाणे पराभव झालेल्यांनेही खचून न जाता आपली प्रगती का नाकारली.? याचा शोधबोध घेवून आत्मचिंतन करुन भविष्यातील संघर्षासाठी सज्ज व्हावे. तसेच भविष्यातही मविप्रचा राज्यात असलेला नावलौकिक टिकवून राजकारण विरहित संस्थेच्या हितासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, एवढीच माफक अपेक्षा.!
– खंडू बोडके – पाटील (करंजगाव-निफाड)
सदस्य : राज्य बियाणे समिती, मंत्रालय,मुंबई
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम