द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : देवळा-सोग्रस या राज्यमार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना वाहने चालवणे अवघड झाले आहे. खड्ड्यात पाणी की पाण्यात खड्डा असा व कोणता खड्डा टाळावा व कोणता चुकवावा असा संभ्रम वाहन धारकांना पडला असून , यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. सोग्रस ते नाशिक या ६० किमी अंतर पार करायला जेवढा वेळ लागतो तितका वेळ देवळा ते सोग्रस या २० किमी अंतर कापण्यासाठी लागतो. या रस्त्यावरून प्रवास करतांना प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागतो.
साधारणतः २० किमी.लांबीचा हा रस्ता भावडबारी घाटातून जातो. घाटातील रस्ताही खड्डेमय झाल्याने वाहनांना अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. पुन्हा पुन्हा चाकांची व्हील बॅलँसिंग करावी लागते तसेच शारीरिक त्रास होतो तो वेगळाच…या रस्त्यावरून देवळा, सटाणा, नवापूर, नंदुरबार, साक्री अशा भागातून नाशिक येथे ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
परंतु या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांना मर्यादित वेग ठेवावा लागतो. त्यामुळे प्रवासास जास्त वेळ लागतो. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. मध्यंतरी घाटातील रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये माती-मुरूम टाकण्याचा प्रयत्न झाला असला तरी पावसाने पुन्हा जैसे थे अवस्था झाली असून, खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे.
शहादा-प्रकाशा राज्यमार्ग ६० म्हणून हा रस्ता ओळखला जातो. आगामी काळात या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होणार असून त्यास राष्ट्रीय महामार्ग ७५२जी असा क्रमांकही मिळाल्याचे कळते. परंतु सध्या मात्र हा रस्ता दुरवस्थेत सापडला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम