द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात माणसाला पेचात टाकणारी घटना घडली आहे. काल ज्याचे अंत्यसंस्काराचे विधी पार पडले ती व्यक्ती आज घरी परतल्याने सर्वांचा चक्रावून टाकले आहे. तरुण बेपत्ता झाला असल्याने शवविच्छेदन गृहातून एक अज्ञात मृतदेह ताब्यात घेतला आणि त्यावर अंत्यसंस्कार केले. परंतु दुसऱ्या दिवशी आपला मुलगा जिवंत असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर कुटुंबीयांनी तरुणाला घरी परत आणले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे आता मुलाच्या कुटुंबीयांनी नेमके अंत्यसंस्कार कोणावर केले याचा पोलिस शोध घेत आहेत.
इंदरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील नौगजा रोड परिसरात राहत असलेला जुगल किशोर सिंह त्याच्या घरातून गायब झाला होता. ग्वाल्हेरच्या महाराजवाड्याजवळ असलेल्या एका बागेत तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. जुगलला अर्धांगवायूचा झटका येऊन गेला असल्यानं त्याच्या शरीराचा निम्मा भाग अधू झाला आहे. त्यातच बागेत मृतावस्थेत सापडलेल्या तरुणालादेखील अर्धांगवायूचा झटका येऊन गेलेला होता. मृतदेह आमच्याच मुलाचा असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. त्यामुळे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदन गृहातील कर्मचाऱ्यांनी कुटुंबाला सोपवला. त्यानंतर जुगलच्या कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
अंत्यसंस्काराचे विधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जुगलचे कुटुंबीय स्मशानात अन्य विधी करण्यासाठी जात होते. ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले, तो मृतदेह आपल्या मुलाचा नव्हता, अशी माहिती त्यावेळी त्यांना समजली. आपला मुलगा गिरवाई परिसरातील दुकानात बसला असल्याचं त्यांना समजलं, याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
माहिती मिळताच पोलीस नौगाजा रोड परिसरात पोहोचले. जुगलच्या कुटुंबीयांना घेऊन ते गिरवाईला पोहोचले. तिथे जुगल एका दुकानाबाहेर बसलेला दिसला. जुगलच्या कुटुंबीयांना आपला मुलगा समजून कोणावर अंत्यसंस्कार केले, याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम