नाशिक : राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी निर्वाणीचा इशारा दिलेला असतानाही नाशिक विभागात कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. आत्तापर्यंत चालक, वाहक, यांत्रिकी, कार्यशाळा यासह अन्य विभागात काम करणाऱ्या ५५० कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शहरातील पंचवटी आगार, विभागीय नियंत्रक कार्यालय, मुंबई नाका बस स्थानक, पेठरोड देखभाल आगार परिसरात सोमवारीही संपकऱ्यांचा जोश कायम असल्याचे दिसून आले.
सोमवारी दीड वाजता स्टेट बँक परिसरातील सव्र्हिस रस्त्यालगत परळ-नाशिक बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. त्याआधी रविवारी औरंगाबाद नाक्यावर बसवर दगडफेक करण्यात आली होती. संप मोडीत काढण्यासाठी सरकार वेगवेगळय़ा माध्यमातून प्रयत्न करत आहे. निलंबनाचे अस्त्र उगारूनही कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. संप आणि दगडफेकीचे सत्र सुरू असतांना महामंडळाने मात्र बस रस्त्यावर धावत असून प्रवासी सेवा देत असल्याचा दावा केला आहे. विभाग नियंत्रक मुकूंद कुंवर यांनी नाशिक, लासलगाव, येवला, सिन्नर येथे ४६ तर पुणे, धुळे, औरंगाबादसाठी ६४ गाडय़ा धावल्याचे सांगितले. सद्यस्थितीत ७५० कर्मचारी कामावर येत असल्याचे कुंवर यांनी नमूद केले.
संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर यायची इच्छा नाही. ५५० कर्मचाऱ्यांना निलंबनाचे पत्र दिले असतांना केवळ १५ जण सोमवारी कामावर परतले आहेत. हे प्रमाण अत्यल्प आहे.
– मुकूंद कुंवर (विभाग नियंत्रक, नाशिक)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम