नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा लढा सुरूच असून हा संप मोडून काढण्यासाठी राज्य शासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याची कारवाई केली जात आहे. या कारवाईच्या धास्तीने आतापर्यंत जिल्ह्यातील ७३४ प्रशासकीय, कार्यशालेय, चालक-वाहक कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे तुरळक प्रमाणात का होईना बससेवा सुरूझाली आहे.
राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या सेवेत सामावून घ्यावे, पगारवाढ यासह इतर मागण्यांसाठी संप सुरू केला आहे. महिन्यापेक्षा अधिक दिवस होऊनही संप सुरूच आहे. जिल्ह्यातील १३ आगारांची बससेवा संपामुळे ठप्प आहे.
संपामुळे महामंडळाचे होणारे आर्थिक नुकसान आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेत वरिष्ठ पातळीवरून दबावतंत्राचा वापर होत आहे. त्यामुळे काही प्रमाणात कर्मचारी कामावर रुजू होण्यास सुरुवात झाली आहे. संपात सहभागी असलेल्या यांत्रिक विभागासह इतर वेगवेगळी जबाबदारी सांभाळणाऱ्या ४४९ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे संपकऱ्यांमध्ये रोष वाढत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातून पुण्यासाठी १०, बोरिवलीसाठी पाच, धुळय़ासाठी आठ, लासलगाव, चांदवड, सिन्नर, इगतपुरी, येवला येथून प्रत्येकी एक बस नाशिककडे येत आहे. बससेवेचे प्रमाण अगदीच अल्प असल्याने प्रवाशांना वेगवेगळय़ा अडचणींना तोंड द्यावे लागत असून नाइलाजाने खासगी प्रवासी वाहतूक सेवेचा आधार घ्यावा लागतोय. त्यामुळे आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम