राज्याच्या राजकारणात नवी नांदी : शिवसेना-संभाजी ब्रिगेड यांची युती

0
35

मुंबई – राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी युती करण्याची जाहीर घोषणा केली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे उपस्थित होते. यासोबतच शिवसेना व संभाजी ब्रिगेड आगामी निवडणुकांमध्ये एकत्रितपणे मैदानात उतरणार असल्याचीही घोषणा केली आहे. या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात एक नवी नांदी येणार आहे.

यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, की या लढवय्या सहकाऱ्यांचे मी स्वागत करतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात विविध प्रादेशिक पक्ष संपवण्याचे कारस्थान सुरु आहे, यालाच लोकशाही मानणारे लोक आता बेतालपणे बोलत आहेत. कोर्टातील निर्णय हा देशात लोकशाही राहील की बेबंदशाही राहील, याचा निर्णय असेल. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे, असे अनेकजण मला म्हणतात. यासाठीच संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन मोठा इतिहास आपण घडवू.

आपण सोबत आलात, मिळून दुहीच्या शापाला गाडून टाकू

ते पुढे म्हणाले की, मला आपण(संभाजी ब्रिगेड) एकत्र आल्याचा आनंद आहे. आपली भूमिका रोखठोक आहे, ती आपल्याला पटली म्हणून आपण एकत्र आलो आहोत. आम्ही सत्तेत होतो, सत्ता पुढे येणारच आहे. पण काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात, ही आपली वैचारिक युती झाली आहे. महाराष्ट्रात आज जे काही घडवले किंवा बिघडवले, ती महाराष्ट्राची ओळख नाही. आमचे हिंदुत्व त्यांना पटल्याने ते सोबत आले आहे. आपण दुहीच्या शापाला गाडून टाकू, दोन्ही पक्षांनी मतभिन्नता कुठे आहे यावर विचार करुन आपण समन्वयाने काम करु, असेही ठाकरे म्हणाले. तसेच या एकीमुळे शिवप्रेमी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला मानणारी मंडळी आनंदी होईल.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे म्हणाले, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या एकत्र येण्याने राज्यात एक चांगले समीकरण तयार होणार आहे. आज देशात लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे, विषमतावादी वातावरण झाले. आज क्रांतीची गरज आहे, म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. संभाजी ब्रिगेड गेल्या ३० वर्षांपासून राज्यात काम करत आहे. व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी सत्तेत येणे गरजेचं आहे. त्यामुळे २०१६ ला संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष झाला. आम्ही विधानसभा, लोकसभासह सर्व निवडणुका लढवणार आहोत, त्यासाठी आम्ही शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडने एकत्र यायचे ठरवले आहे.

लवकरच संयुक्त महामेळावा होणार – गंगाधर बनबरे

संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना प्रबोधनकारांचा विचार आक्रमकपणे मांडला. त्यांनी संघप्रणित विषमतावादी विचारांना सर्वशक्तीनिशी कार्यपद्धतीने विरोध केला. संभाजी ब्रिगेड देखील लोकहित आणि महाराष्ट्राचे हित याच पार्श्वभूमीवर काम करत आहे. आता छोटे पक्ष संपवण्याचे कारस्थान सध्या सुरु आहे, लोकशाही धोक्यात आली आहे. अशावेळी छोटे पक्ष, संघटना आणि विचारधारा जर अस्तित्वात ठेवायची असेल तर त्यासाठी एकत्र येणं गरजेचे आहे, त्यामुळेच आम्ही आज एकत्र आलो आहोत आणि लवकरच एक संयुक्त महामेळावा घेतला जाईल, असं बनबरेंनी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here