मुंबई – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस आहे. ते कन्याकुमारी ते काश्मीर असा ३५७० किमीचा प्रवास ह्या यात्रेच्या माध्यमातून करणार आहे. दरम्यान, काल भाजपने राहुल गांधी यांनी परिधान केलेल्या टी-शर्टवरून टीका केली होती, त्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ह्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
ट्वीटरवरून नाना पटोलेंनी ट्वीट करत म्हटले आहे, “भाजपचे भय संपत नाही ! राहुल गांधींबद्दल टीशर्टची किंमत वगैरे असे टुकार मुद्दे भाजपाला काढावे लागणे, यातूनच हे सिद्ध होते की ‘भारत जोडो यात्रे’मुळे भाजपाला धडकी भरली आहे. राहुल गांधींबद्दल भाजपाचे भय संपत नाही आणि आठवण करूनच द्यायची झाली तर आपल्या देशाला एक असे फकीर लाभले आहेत जे १० लाख रुपयांचा सुट परिधान करतात.”
भाजपचे भय संपत नाही.!
श्री. राहुल गांधींबद्दल टीशर्टची किंमत वगैरे असे टुकार मुद्दे भाजपला काढावे लागणे यातूनच सिद्ध होतंय की 'भारत जोडो यात्रे'मुळे भाजपला धडकी भरली आहे. श्री. राहुल गांधींबद्दल भाजपचे भय संपत नाही.!
1/2#BharatJodoYatra pic.twitter.com/qHEF40JvQw— Nana Patole (@NANA_PATOLE) September 9, 2022
याआधी काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी भाजपवर निशाणा साधत म्हणाले होते की, “आता तर दया येते त्यांची ! केंद्रातील सत्ताधारी पक्षाकडे कन्याकुमारी ते काश्मीर या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या भारत जोडो यात्रेचे उत्तर एक ‘टी-शर्ट’ आहे. लोकशाहीत जेव्हा एक पक्ष देशाला एकत्र करत आहे, तर फूट पाडणारा पक्ष अजूनही टी-शर्ट आणि खाकी शॉर्ट्समध्ये लटकत आहे, ही भीती चांगली आहे.”
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी या यात्रेच्या निमित्ताने ते देशभरातल्या जनतेशी संवाद साधणार आहे. संपूर्ण देशाला एकत्र करणे हा यात्रेचा मुख्य उद्देश असून बेरोजगारी, महागाई अशा विविध मुद्द्यांवर लोकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे. ही यात्रा तब्बल १५० दिवस बारा राज्यांतून जाणार आहे, ज्यात त्यांच्यासोबत १५०हून अधिक सहकारी दररोज २२ किमीची पदयात्रा करत विविध ठिकाणी मुक्काम करणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम