द पॉईंट नाऊ ब्युरो : महाराष्ट्रातल्या राजकारणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, आधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असे सांगितले जात असताना, आता मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच राहतील असे संजय राऊत यांनी सांगितल्याने, गेम पलटला की काय अशी चर्चा होऊ लागली आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 35 आमदार असल्याचे सांगत सुरत गाठली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. या कारणाने हे सरकार कोसळणार अशी दाट शक्यता बळावली. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री उशिरा वर्षा निवासस्थान सोडून, मातोश्री गाठले. यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार, यावर जणू एक प्रकारचे शिक्कामोर्तबच झाले.
मात्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार नाहीत. तुम्ही चुकीची न्यूज चालवत आहात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि राहतील. आवश्यकता पडल्यास बहुमत सिद्ध करू, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. यामुळे राज्यातील राजकारणाला आता वेगळेच वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, नाना पटोले या नेत्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे पवार ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. असे देखील राऊत म्हणाले होते. आता नेमके काय चित्र पालटते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे हे आमदारांसह गुवाहाटी येथे जाऊन पोहोचले आहेत. त्यात गुलाबराव पाटील देखील काही आमदारांसह गुवाहाटी येथे गेलेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. पण संजय राऊत यांनी आता वेगळाच गुगली टाकल्याने, राज्याच्या राजकारणात अजून काही घडामोडी घडणे बाकी आहे हे स्पष्ट दिसुन येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम