द पॉईंट नाऊ ब्युरो : महाविकास आघाडी सरकारमध्ये नेहमीच काही ना काही धुसफूस दिसून आली आहे. आता या आघाडी सरकारमधील अपक्ष आमदार तथा शिवसेना नेते आशिष जैस्वाल यांनी राज्यातील मंत्री हे मतदारसंघाच्या कामातून देखील टक्केवारी मागतात, असा गंभीर आरोप केला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस अनेकवेळा दिसून आली आहे. तसेच ईडीची साडेसाती या सरकार मधील बऱ्याच मंत्र्यांच्या मागे लागली. आता या सरकार मधीलच घटक असलेल्या आमदार आशिष जैस्वाल यांनी सरकार मधील मंत्र्यांवरच टक्केवारी मागत असल्याचा आरोप केला आहे. राज्यातील मंत्री मतदारसंघाच्या कामातून आर्थिक मोबदला मागतात. मंत्र्यांना पैसे दिले, तरच ते मतदार संघासाठी निधी देतात. असा आरोप आशिष जैस्वाल यांनी केला आहे. यामुळे महाविकास आघडी सरकारमध्ये चांगलीच चलबिचल सुरू झाली आहे. तर विरोधी पक्षांना यामुळे आयते कोलीत मिळाले आहे.
याआधी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल देशमुख यांना ईडीने 100 कोटी वसुली प्रकरणी अटक केली. त्यानंतर मंत्री नवाब मलिक मनी लॉनड्रिंग प्रकरणी अटकेत आहेत. अनिल परब यांच्यावर देखील टांगती तलवार आहे. आणि आता तर या महाविकास आघाडीचाच घटक असलेल्या आमदाराने आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर टक्केवारीचा आरोप केला आहे.
आता यावर कोण काय स्पष्टीकरण देते आणि भाजप यावरून सरकारवर कसा निशाणा साधते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम