नवनीत आणि रवी राणा या दांपत्याने आज मातोश्री या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करणार आहे. पण त्यामुळे राज्यात चांगलीच खळबळ माजली आहे. त्यांच्या या निर्णयावर किशोरी पेडणेकर यांनी हल्लाबोल केला.
राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झालं याची माहिती मिळताच मातोश्री आणि परिसरातला बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. यावरून आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या दाम्पत्याला चांगलंच सुनावलं आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “राणा दाम्पत्य हे नौटंकी करत आहे. ते सुपारी बहाद्दर दाम्पत्य आहे. अपक्ष आमदार आणि खासदार यांना झेड प्लस सिक्युरिटी देण्याचे कारण काय ? ठीक आहे त्यांच्या जीवाला धोका आहे तर त्यांनी सिक्युरिटी घ्यावी.
पैशांच्या जोरावर निवडून येऊन, माज करतात. आता सुरक्षा मिळाली त्यामुळे त्यांना देशभरात भ्रमंती करायची आहे. जिथे भाजपचं सरकार नाही, तिथेच हे लोक भ्रमंती करणार हे लिहून ठेवा. हे दाम्पत्य असंच बरळत राहणार आणि मुंबई-महाराष्ट्र अस्थिर करणार. किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या, “हे सुपारी बाज दाम्पत्य कसला गनिमीकावा करणार ? याला नीच आणि घाणेरडा कावा म्हटले पाहिजे. हिंदुत्व हे आमच्या रक्तात आहे हिंदुत्व हा आमचा ध्यास आहे हिंदुत्व आमचा श्वास आहे आम्हाला हनुमान चालीसा मुखोद्गत आहे तेव्हा ही नौटंकी बंद करा.”
तुम्हाला हनुमान चालीसा म्हणायचे असेल तर एखाद्या मंदिरात जा किंवा अन्य कुठेही जा पण मातोश्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत करू नका. शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नका. तुमचा मतदारसंघ हा अमरावती आहे तिथे लक्ष द्या. हनुमान चालीसा वाचायला येतायत पण, तुमचा उद्देश क्लियर नाही अशा शब्दांत पेडणेकर यांनी राणा दाम्पत्यांना खडेबोल सुनावले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम