राऊत राज ठाकरेंवर बरसले, सोमय्याला शिवतीर्थ बंगल्यावर बोलवा आणि सत्कार करा

0
175

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यात झालेल्या उत्तरसभेत टीका केली होती. या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

किरीट सोमय्यांनी घेतलेली मराठीविरोधी भूमिका आणि मुंबई तोडण्यासाठी केलेल्या सादरीकरणाचं समर्थन करणार असाल तर माझ्यावर जरुर टीका करा. पण तुमची भूमिका बदलली असेल तर किरीट सोमय्याला तुमच्या शिवतीर्थ बंगल्यावर बोलवा आणि शाल, श्रीफळ देऊन सत्कार करा, त्याच्यासमोर झुका आम्हाला काही म्हणायचं नाही. पण मराठी माणूस हे सहन करणार नाही . शिवराळ भाषा वापरण्यावरुन केलेल्या टीकेवर बोलताना त्यांनी आपल्याला गर्व असल्याचं म्हटलं आहे.

मी किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध शिवराळ भाषा का वापरली, याचा राज ठाकरे यांनी अभ्यास केला पाहिजे होता. जेणेकरून त्यांना माझी वेदना समजून घेता आली असती. हाच किरीट सोमय्या महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची असू नये, म्हणून न्यायालयात गेला होता. सोमय्या आणि त्यांच्या पंटर्सनी मिळून मुंबईला महाराष्ट्रपासून तोडण्याचे प्रेंझेटेशन तयार केले आहे. त्यासाठी हे सर्वजण दिल्लीत लॉबिंग करत आहेत. ही गोष्ट समजल्यामुळे संतापाच्या भरात माझ्या तोंडातून शिवी बाहेर पडली. यासाठी मराठी जनता मला माफ करेल आणि उत्तेजनही देईल, अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रावर जर कोणी अशाप्रकारे थुंकण्याचा प्रयत्न करत असेल तर माझ्यासारखा प्रत्येक शिवसैनिक, मराठी माणूस अशाच प्रकारची शिवराळ भाषा वापरेल असा इशारा संजय राऊतांनी दिला. ज्यांना ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत उत्तर द्यावं असं बाळासाहेब आणि आचार्य अत्रे यांनी सांगितलं होतं. ते आमचे दैवत आहेत, तुमचे नसतील. तुमचे वेळे सोबत बदलले असतील. दुसरे शेंदूर लावून फिरत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका. तुमची अक्कल दीड वर्ष ईडी कार्यालयात गहाण पडली होती. ती काल सोडवण्यात आल्याने तुमचे भोंगे वाजू लागले आहेत ते महाराष्ट्राची जनता बंद करेल असंही ते म्हणाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर काय बोलले असते अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

बाळासाहेब ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यासंबंधी भूमिका मांडली होती. पण हा भाजपाचा भोंगा आहे. ईडीची कारवाई झाली त्याबद्दल भाजपाने सूट दिली असून त्यानंतर हा भोंगा सुरु झाला आहे. दीड वर्ष हा भोंगा बंद होता अशी टीका संजय राऊत यांनी केली.अल्टिमेटम राज्य सरकारला कोणी देत नाही. अल्टिमेटम देण्याची हिंमत या देशात आणि महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती. बाळासाहेबांनी दहशतवाद्यांना अल्टिमेटम दिला होता. अमरनाथ, वैष्णेदेवी यात्रा असो किंवा दहशतवादी कारवाया…अल्टिमेटम देण्याची ताकद आणि कुवत राजकारणात, देशात फक्त बाळासाहेबांमध्ये होती,” असं यावेळी संजय राऊत म्हणाले.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here