पुणे प्रतिनिधी : कालची घटना राज्यात अचानक घडल्याने भूकंप झाला पवारांच्या घरावरील हल्ल्याने राज्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. ‘एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हा राज्याचा प्रश्न होता. तुम्हाला मोर्चा आणि हल्लाच करायचा होता, तर ‘मातोश्री’वर करायचा. मग तुम्हाला कळलं असतं, हल्ल्याची किंमत काय मोजायला लागली असती,’ अशा शब्दांत हल्लेखोर आणि त्यामागे असणाऱ्या लोकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनी खडसावले आहे.
राजगुरुनगर पोलिस ठाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चाला संबोधन करतांना मोहिते म्हणाले की, राज्याचे परिवहन खातं शिवसेनेच्या परब यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे, मग तुम्हाला जे काय करायचे, ते ज्याच्याकडे खातं आहे, तिकडे करायचे होते. ज्या विषयाशी पवारांचा संबंध नाही, जो विषय पवार हाताळत नाही, त्यासाठी जाणीवपूर्वक हल्ला घडवून आणण्यामागे काही लोकांचा विशिष्ट हेतू आहे. महाविकास आघाडी सरकार चालविण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वात मोठा वाटा आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला अस्थिर करण्यासाठी हल्ला घडवून आणल्याचा आरोप मोहिते यांनी केला.
राज्यातील मंत्रिमंडळात कुठलाही निर्णय झाला, तर मुख्यमंत्री त्या विरोधात भूमिका घेऊ शकतात. एसटी कामगारांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काहीही निर्णय घेतला असता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाच आक्षेप नव्हता, तरी जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसला संपविण्याचे काम काही शक्ती करतात असे दिलीप मोहिते यांनी विरोधकांना सुनावले.
एसटीच्या आंदोलक कामगारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. अशा वाईट प्रसंगातसुद्धा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एसटी कामगारांसमोर हात जोडून मोठं मन दाखवलं, त्याबद्दलही त्यांचे कौतुक या वेळी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम