निकाल लागला – फडणवीसांनी डाव साधला, महाविकास आघाडी झाली ‘त्रिफळाचीत’

0
44

द पॉईंट नाऊ ब्युरो : राज्यसभा निवडणुकीचे निकाल अखेर लागले आहेत. यात शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. भाजपचे तीन उमेदवार निवडून आले असून, महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक-एक उमेदवार विजयी झाले आहेत.

शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेस पक्षाचे इम्रान प्रतापगढी हे विजयी झाले. तर भाजपचे अनिल बोंडे, पियुष गोयल आणि धनंजय महाडिक हे विजयी झाले आहेत. दरम्यान, संजय पवार यांचा पराभव झाल्याने, शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

पडद्यामागे काय झाले?

काल निवडणूक झाल्यानंतर मोठा विवाद झाल्याने मतमोजणी लांबली होती. भाजपने महाविकास आघाडीची तीन मते बाद करण्याची मागणी केली होती. आधीच महाविकास आघाडीचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख मतदान करू शकणार नसल्याने, त्यांना धक्का बसला होता. म्हणून निर्णय राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे गेला. अखेर याबाबत निर्णय घेऊन आज पहाटे निकाल जाहीर झाले. आणि यात भाजपने 6 पैकी 3 जागा आणि महाविकास आघाडीला प्रत्येक पक्षाला एक-एक जागेवर समाधान मानावे लागले.

कोणाला किती मते मिळाली?

भाजपचे अनिल बोंडे आणि पियुष गोयल यांना पहिल्या पसंतीची 48 मते मिळाली. तर शिवसेनेचे संजय राऊत यांना पहिल्या पसंतीची 41, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना 43 आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना 44 मते मिळाली आहेत.

शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत बाद झाले

सुहास कांदे यांचा बॅलेट पेपर कॅमेरा अँगल मध्ये येत होता. त्यांनी तो फोल्ड केलेला नव्हता. निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावून देखील ते खुला बॅलेट पेपर घेऊन फिरत होते. त्यांनी तो फोल्ड न करता पोलिंग एजंटकडे दिला. या कारणाने कांदे यांचे मत बाद झाले.

दरम्यान, भाजपने महाविकास आघाडीच्या जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या तीन मतांवर आक्षेप घेतला होता. तर महाविकास आघाडीने भाजपचे रवी राणा आणि सुधीर मुनगुंटीवार यांच्या मतांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया खूप लांबली. मात्र अखेर आज पहाटे निकाल लागला.

निकालानंतर काय म्हणाले दोन्ही गटांकडील नेते?

– निकालानंतर भाजप नेते देवेन्द्र फडणवीस यांनी ‘निवडणूक फक्त लढण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढली होती’ असे ट्विट केले.

– राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील म्हणाले – आमचे दोन नेते मतदान करू शकले नाहीत, तर सुहास कांदे यांचे मत बाद झाले. म्हणून महाविकास आघाडीला फटका बसला.

– आम्हाला या पराभवाची समीक्षा करावी लागेल, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

राज्यसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीने अखेर पराभव मान्य केला असून, भाजप कार्यकर्ते मोठा जल्लोश करत आहेत.

या निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार यांना 33 मते आणि त्यांचे विरोधी भाजपचे धनंजय महाडिक यांना 41 मते मिळाली. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीची 9 मते फुटल्याची चर्चा असून, याचाच फटका मविआला बसला असे बोलले जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here