भूषण सावळा-पाटील : कोरोनाने सगळीकडेच हाहाकार माजवल्याने पूर्वीसारखे आयुष्य आज जगता येत नाही. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर तर सगळेच बंद होते. मात्र कालांतराने सर्व काही पूर्ववत सुरू करण्याच्या दिशेने महाराष्ट्र राज्य शासनाच्या हालचाली सतत सुरू आहेत.
आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठक पार पडली. ज्यात येत्या १५ ऑगस्ट पासून राज्यभरातील मॉल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यातील काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता सगळीकडे हॉटेल व रेस्टॉरंट हे संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी होती. मात्र आता सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल हे येत्या १५ ऑगस्ट पासून सुरू तर होणार आहेतच. पण त्याचसोबत हॉटेल, रेस्टॉरंट ची वेळ वाढवण्यात येऊन रात्री १० वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
मागील काही कालावधी पासून हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र मॉल्स सुरू होण्याच्या प्रतीक्षेत होते. मॉल्स चालकांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. येत्या १५ ऑगस्ट पासून मॉल्स देखील सुरू होणार आहेत. मात्र मॉल्स मध्ये केवळ कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच आत येण्याची परवानगी असणार आहे. ज्यामुळे बंधन असणार आहे, ते डोस न घेतलेल्यांसाठी आणि एक डोस घेतलेल्यांसाठी.
मागील बऱ्याच काळापासून मॉल्स सुरू करण्याची, हॉटेल, रेस्टॉरंट ची वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगाने आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक महत्वपूर्ण ठरली.
काही जिल्ह्यांमध्ये बंधने लादली गेली असल्याने व्यावसायिक वर्गात नाराजी होती. आता राज्यभरातील व्यावसायिकांना यामुळे एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल उघडण्यास परावणगी असली, तरी मंदिरे आणि सिनेमागृहे मात्र पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या मंदिरे आणि सिनेमा ग्रहांच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. मॉल्स, हॉटेल, बार यांना परवानगी, मात्र मंदिरे बंद का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मंदिरे सुरू होण्यास अजूनही प्रतिक्षाच करावी लागणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम