द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : महाविकास आघाडी सरकारच्या पाठीमागची साडेसाती संपायचे काही नाव घेत नाही, असच सध्या म्हणावं लागेल. महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यांच्या खुर्च्या एकामागे एक पणाला लागू लागल्यात असच दिसून येतंय.
महाविकास आघाडी सरकार मधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. आणि आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मागे देखील विरोधी पक्ष हात धुवून लागले आहेत. अनिल परब यांचे दापोलीतील दोन रिसॉर्ट हे अनधिकृत असूनही, केवळ कॅबिनेट मंत्री असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप, भाजप(bjp) नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. दापोलीतील दोन रिसॉर्ट पैकी एकावर आणि मंत्री अनिल परब यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश असतांनाही, ते मंत्री असल्याने कारवाई होत नसल्याचे आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
एकामागे एक मंत्र्यांवर आरोप करण्यात येत असल्याने, महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. याआधी मंत्री धनंजय मुंडे, नंतर मंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) आणि आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षाने लावून धरली आहे.
कधीकाळी सवंगडी असणारे भाजप आणि शिवसेना यांमधून शिवसेनेने काढता पाय घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यापासून शिवसेना आणि भाजप यांमध्ये आरोप प्रत्यारोप सतत सुरूच आहेत.
मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thekrey) यांवर एकामागे एक असे भाजपने टीकास्त्र सुरू केले, तेव्हापासून महाविकास आघाडी सरकार अस्थिरतेच्या वाटेवर जाऊ लागल्याची चर्चा होऊ लागली होती. या आघाडीमधील एक घटक असलेल्या काँग्रेस पक्षाद्वारे देखील वारंवार नाराजी व्यक्त केली जात असल्याने, महाविकास आघाडी सरकार मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. यामुळे हे आघाडी सरकार कितपत तग धरणार असे वाटू लागले होते.
अजूनही महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यांवर आरोप सुरूच असल्याने सरकारचे संकट अद्याप संपलेले नाही.
मंत्री अनिल परब यांची देखील लवकरच मंत्री मंडळातून हकालपट्टी होईल, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. आता या प्रकरणात अजून पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
महा वसूली सरकार आहे. यापेक्षा काय अपेक्षा