साजन साळवे
कोकण प्रतिनिधी : कोकणात सेना भाजपात जोराचे धुमशान सुरू असून, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर कोकणात राजकारण चांगलेच तापले होते. शिवसैनिक संतोष परब यांना निवडणुकीच्या काळात आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती असा आरोप संतोष परब आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला होता. यानंतर चांगलेच वातावरण ढवळून निघाले आहे.
या आरोपानंतर नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण निवडणूक होई पर्यन्त आमदार नितेश राणे हे अज्ञातवासात होते. या निवडणुकीत शिवसेनेचा जिल्हा बँकेत दारुण पराभव झाला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आली. जिल्हा बँकेत मनीष दळवी यांची अध्यक्ष म्हणून वर्णी लागली.
नुकतेच न्यायालयाकडून आमदार नितेश राणे यांचा जामीन काल पुन्हा एकदा फेटाळण्यात आला आहे. नितेश राणे यांचे पीए राकेश परब यांना ४ दिवसांची कोठडी ठोठवण्यात आली आहे. नितेश राणे हे जेव्हा न्यायालयात येत होते तेव्हा त्यांची गाडी काल पोलीस अधिकाऱ्यांकडून काही काळासाठी अडविण्यात आली होती. तेव्हा नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनी पोलिसांसोबत बाचाबाची केली होती. काही काळ तणावाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झाले होते.
काल झालेल्या प्रकारानंतर आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना पत्र लिहले होते. वैभव नाईक यांनी लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे, १/२/२०२२ रोजी दुपारी ३.०० वा. ओरोस सत्र न्यायालयाच्या बाहेर निलेश नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जमावबंदी आदेश असतांना देखील याठिकाणी बंदोबस्ताकरिता तैनात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी स्वत: व त्यांच्या २५ च्या आसपास समर्थकांनी अरेरावी व अर्वाच्या भाषेमध्ये पोलीसांना शिवीगाळ केली. सदर घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण विविध वृत्तवाहिन्यांवरुन प्रसारीत झाले आहे आणिया संदर्भात त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
नाईक यांच्या पत्रानंतर जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम