द पॉईंट नाऊ ब्युरो : एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीचा भाग होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबतची इच्छा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे व्यक्त केली आहे. मात्र यावरून महाविकास आघाडीमध्ये दोन गट पडल्याचे दिसुन येत आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे हे इम्तियाज जलील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यानंतर त्यांची भेट घेण्यास गेले होते. यावेळी जलील यांनी टोपे यांच्याजवळ महाविकास आघाडीत येण्याची इच्छा बोलून दाखवतांना, शरद पवारांपर्यंत निरोप पोहोचवण्याची इच्छा राजेश टोपे यांच्याजवळ व्यक्त केली होती.
मात्र यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी, औरंगजेबाच्या कबरीसमोर झुकणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाहीत. महाविकास आघाडीत आत्ता आहेत ते तीनच पक्ष असतील, असे म्हणत एमआयएम ला सोबत घेण्यास विरोध दर्शवला आहे. तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी, एमआयएमने आधी ते भाजपविरोधी असल्याचे कृतीतून सिद्ध करावे असे म्हटले आहे.
या कारणांमुळे एका बाजूला एमआयएमला सोबत घेण्यास शिवसेनेचा विरोध असतांना, दुसरीकडे राष्ट्रवादी मात्र याबाबत एक प्रकारे अनुकूलच असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
एमआयएम आणि भाजप सोबत असल्याचे आरोप आत्तापर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी अनेक वेळा म्हटले आहे. मात्र आता एमआयएमने महाविकास आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त केल्याने, आता याबाबत महाविकास आघाडी काय निर्णय घेते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मतदानाची विभागणी टाळण्यासाठी महाविकास आघाडी एमआयएमला सोबत घेऊ शकते. अशी चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे. आता याबाबत काय निर्णय होतो? हे लवकरच स्पष्ट होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम