मालेगाव : तालुक्यातील बोरी अंबेदरी धरणातून शेती सिंचनास पाणी पुरवठा करण्यासाठी बंदिस्त पाईप लाईन कालवा प्रकल्पास मालेगाव बाह्याचे आमदार, राज्याचे बंदरे व खानिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दादाभाऊ भुसे साहेब यांच्या अथक प्रयत्नांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली असून त्यानुसार १७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. परंतु या प्रकल्पाला बोरी अंबेदरी धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी या योजनेला कडाडून विरोध करत पालकमंत्री महोदय यांना भूमिपूजन समारंभास जात असतानाच काळे झेंडे दाखवून विरोध दर्शवला होता, त्याचबरोबर गेल्या १९ दिवसांपासून बोरी अंबेदरी धरणाच्या जवळ जंगलात रात्रंदिवस बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे त्यास वांजुळपाणी संघर्ष समिती आपला पाठींबा दर्शवत आहे.
वस्तुतः बोरी अंबेदरी धरण अतिशय अल्प पाणी क्षमतेचे आहे. ज्या ठिकाणी धरण निर्माण झाले आहे तिच्या आजूबाजूला धरणाची क्षमता वाढविण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध आहे, धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ असून तो काढून धरणाची उंची वाढवून पाणी क्षमता वाढविणे पाट कॅनल दुरुस्ती करत अवास्तव गळती रोखून पाण्याचे योग्य नियोजन करत हेड ते टेल सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना पाणी देणे गरजेचे आहे. तसे न करता बंधिस्त पाईप लाईन कालवा प्रकल्प राबविणे शेतकरी हिताचा नाही त्याला शेतकऱ्यांचा विरोध योग्य आहे.
मालेगाव तालुक्यातील शेती सिंचनासाठी पाणी पुरवठा करणारे साठे अतिशय अल्प प्रमाणात आहेत. गिरणा व मोसम नदीच्या पूर पाण्याव्यतिरिक्त इतर पाण्याचे शास्वत स्त्रोत उपलब्ध नाहीत, ते उपलब्ध करून पाणी वाटप नियोजन करणे आवश्यक होते. माननीय दादाभाऊ भुसे साहेब गेल्या आठ वर्षांपासून राज्याच्या मंत्रिमंडळात महत्त्वाच्या जबाबदारीवर आहेत. कळवण सटाणा मालेगाव देवळा चांदवड नांदगाव या अटी तृटीच्या खोऱ्याला न्याय देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. तापी गिरणा नदी खोऱ्यात नार पार, आंबिका औरंगा, ताण माण नद्यांचे पाणी प्रवाही वळण योजनेद्वारे गिरणा नदीत वळविण्याचा नदी जोड प्रकल्प राबविण्याची गरज आहे. मागील काळात गिरणा खोऱ्याचा हक्काचा मांजरपाडा प्रकल्प तत्कालीन पालकमंत्री छगनराव भुजबळ साहेब यांनी आपले राजकीय वजन वापरून गोदावरी खोऱ्यात वळवून आपल्या मतदार संघातील दुष्काळी भागाला पाणी उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कॅबिनेट मंत्री दादाभाऊ भुसे साहेब यांनी करणे आवश्यक आहे.
मांजरपाडा प्रकल्पासाठी आंदोलन सुरू झाले असता लोकप्रतिनिधी व आंदोलनकर्ते यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक घेऊन एकाच वेळी मांजरपाडा १ व मांजरपाडा २ असे आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले होते. मागील काळात ना. भुसे साहेब त्यांच्या सोबत मंत्रिमंडळात समाविष्ट होते. तत्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ना. दादाभाऊ भुसे साहेब त्यांच्या जवळ होते त्याकाळात ना. भुसे साहेब यांनी प्रवाही वळण योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले असते तर नक्कीच कळवण सटाणा मालेगाव देवळा चांदवड नांदगाव तालुक्याचा पाणी प्रश्न कायमचा सुटला असता.
मागील काळात शासन निर्णय जलसंपदा विभाग, क्र. पाऊप्र – २००८ /(१७६/०८)/ जसंअ, मंत्रालय, मुंबई दि- १६/१/२००९ अन्वये वांजुळपाणी योजनेच्या सविस्तर सर्वेक्षण कामाचे रु.१०१.२६ लक्ष किंमतीचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्राप्त असून स्थानिक माजी लोकसभा सदस्य दिंडोरी श्रीमान हरीचंद्रजी चव्हाण साहेब व माजी विधानसभा सदस्य कळवण-सूरगाणा श्रीमान कॉ. जे. पी. गावित साहेब यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या मागणीत समावेश असलेल्या वांजुळपाणी योजना फायदेशीर ठरू शकते असे पत्र पाठवून स्थानिक लोकांचा विरोध नसल्याचे दिसून येते. आता गुजरात राज्य सरकारने पच्छिम वहिनी नद्यांच्या पाण्यावरील आपला हक्क सोडला आहे त्यामुळे आता महाराष्ट्र शासनाला कसलीच अडचण शिल्लक राहिली नाही.
ना. दादाभाऊ भुसे साहेब यांनी बोरी अंबेदरी बंधीस्त पाईप लाईन कालवा प्रकल्पसारख्या छोट्याश्या प्रकल्पात आपली खूप महत्त्वाकांक्षा व वजन खर्ची पाडण्यापेक्षा संपूर्ण कसमादेनाच सह जळगाव जिल्ह्याला लाभ होईल अश्या नार पार अंबिका औरंगा ताण माण या पच्छिम वहिनी नद्यांचे पाणी वांजुळ पाणी प्रवाही वळण योजनेद्वारे पूर्व भागातील तृटीच्या गिरणा खोऱ्यात वळविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करावी अशी अपेक्षा प्रा. के एन अहीरे, विश्वासराव देवरे, निखिल पवार, देवा पाटील, अनिल निकम, शेखर पवार, दत्तू नाना खैरनार, सुशांत कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम