मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात “हॅलो नव्हे, वंदे मातरम् बोला” या अभियानाचा शुभारंभ होत आहे. वर्धा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ होणार आहे.
राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्यलढ्यातील दिशादर्शक आणि क्रांतीचे निदर्शक असणाऱ्या या गीताच्या सुरुवातीच्या दोन शब्दांनी म्हणजेच “वंदे मातरम्”ने शासकीय कार्यालयातील दूरध्वनी संभाषणाची सुरुवात व्हावी. यासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे आग्रही होते.
यासाठीच सर्व शासकीय कार्यालयांबरोबर निमशासकीय कार्यालये, शासकीय अनुदानित, विना-अनुदानित कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था तसेच शासनाच्या अंगीकृत उपक्रमे आणि आस्थापनात दूरध्वनीवर अभ्यागत किंवा सहकारी यांच्याशी संवाद साधण्याच्या सुरुवातीला “हॅलो” न म्हणता “वंदे मातरम्” असे म्हणण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे. पण यासाठी कोणावरही सक्ती करण्यात आलेली नाही, असेही ह्या परिपत्रकात म्हटले आहे. तसे परिपत्रक काल सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सामन्यतः दैनंदिन आयुष्यात आपण ‘हॅलो’ शब्दाने संभाषणाला सुरुवात करतो. हा शब्द कोणताही विशिष्ट अर्थ नसलेला आणि संभाषणकर्त्यांमध्ये कोणतीही आपुलकी न जागवणारा केवळ एक अभिवादन करणारा शब्द आहे. पण ‘वंदे मातरम्’ हा फक्त नारा नसून राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य इतिहास आहे. राज्यात वंदे मातरम् बाबत प्रचार-प्रसार आणि जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी या गीताचा इतिहास आणि त्याच्याशी निगडित घटना यांचा प्रचार व प्रसार यातून करण्यात येणार आहे. त्याचसोबत याबाबत विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम