द पॉईंट नाऊ ब्युरो : सोलापूरमध्ये एक अतिशय हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. लग्नपत्रिका देवाच्या पायाशी ठेवण्यासाठी गेलेल्या नवरदेवासह दोघा मित्रांना आपला जीव गमवावा लागला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवरदेव दीपक बुचडे हा त्याचे मित्र आकाश साखरे आणि आशुतोष माने यांसह पुणे येथून अक्कलकोट येथे पत्रिका देवाच्या पायाशी ठेवण्यासाठी व वाटपासाठी कारने निघाला होता. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला. सोलापूर येथे शक्करपीर या दर्ग्याजवळ आले असता, त्यांची कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात तिघांनाही जागीच आपले प्राण गमवावे लागले.
कोणाच्याही आयुष्यात लग्न हा सर्वात अधिक आनंदाचा क्षण असतो. भारतीय संस्कृतीत लग्नासाठी मुलगी बघायला जाण्यापासून ते लग्नानंतरच्या सत्यनारायण पूजेपर्यंत सारे काही मुहूर्त बघून आणि विधिवत केले जाते. यादरम्यान लग्न जमल्यावर त्याच्या पत्रिका छापल्या जातात. आणि त्या पत्रिका वाटपाच्या आधी देवाच्या चरणी वाहायची आपली भारतीय संस्कृती आहे. मोठ्या भक्तिभावाने देवाच्या चरणी पहिली पत्रिका ठेवली जाते आणि त्यानंतर इतरांना पत्रिका वाटल्या जातात. मात्र लग्न जमलेल्या दीपक बुचडे याच्यासह त्याच्या मित्रांचा काळाने घात केला. त्यांच्यावर अर्ध्यावरच काळाने झडप घातली. यामुळे लग्नघरी असलेला आनंद अचानक दुःखात परिवर्तित झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम