रेशन कार्डधारकांना मिळणार विशेष पॅकेज; राज्य सरकारचे दिवाळीनिमित्त मोठे गिफ्ट !

0
41

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने आगामी दिवाळी सणानिमित्त मोठे गिफ्ट दिले आहे. दिवाळीनिमित्त राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी विशेष दिवाळी पॅकेजची घोषणा आज शिंदे-फडणवीस सरकारने केली आहे.

त्यानुसार या विशेष पॅकेजमध्ये राज्य सरकार राज्यातील १ कोटी ७० लाख रेशन कार्ड धारक कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना केवळ शंभर रुपयांत प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर व तेल देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्य सरकारने पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांना घरबांधणीसाठी पूर्वीप्रमाणे बँकांमार्फत कर्ज देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात ह्या दोन महत्वाच्या निर्णयासह आणखी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय :

१. राज्यातील १ कोटी ७० लाख रेशन कार्ड धारकांना प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर व तेल केवळ शंभर रुपयांत देणार. यासाठी एकूण ४८६ कोटी ९४ लाख खर्चाला राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच दिवाळीच्या आतच ह्याचे वितरण करण्याचे व कुठलीही तक्रार येऊ न देण्याची सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाला केली आहे.

२. पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना आता पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देणार. २०१६ पासून बँकांकडून कर्ज देण्यात आले होते. मात्र, जून २०२२ मध्ये ही योजना खंडीत करून पोलिसांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय नियमित घरबांधणी अग्रीम योजना देण्याचा निर्णय झाला होता. मात्र यासाठीची रक्कम शासनाकडून एकरकमी उपलब्ध होणे शक्य नसल्याने पूर्वीप्रमाणेच बँकामार्फत कर्ज घेण्याची योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

३. आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमण्याचा निर्णय आज घेतला आहे. या कंपन्यांना सामजंस्य करार करून त्यांना थेट नियुक्तीने आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या अंमलबजावणीची कामे देण्यात येतील.

४. नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-१ ला गती देण्यासाठी सुधारित ९२७९ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली. म्हणजे प्रकल्पाचा मूळ खर्चात ५९९ कोटी ६ लाख रुपये इतकी वाढ झाली आहे. एकूण ३८ किमीच्या मार्गांपैकी २६ किमी मार्गावर मेट्रो सेवा सुरु असून उर्वरित १२ किमीचा मार्ग लवकरच सुरु होणार आहे.

५. भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देण्यासाठी सुमारे ३३६ कोटी २२ लाख इतक्या सुधारित खर्चास आज मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे भंडारा जिल्ह्यातील २७ व गोंदिया जिल्ह्यातील १ अशा २८ गावांतील ५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. 

६. उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती मिळावी, यासाठी ११ हजार ७३६ कोटी ९१ लाख रुपयांच्या सुधारित खर्चाला मान्यता मिळाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम, वाशी, कळंब, तुळजापूर, लोहारा व उमरगा तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील १३३ गावांतील १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे. 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here