द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : धारावीतील सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासाबाबत दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तनाबाबत शहर पोलीस आयुक्त संजय पांडे हे चौकशी करत आहेत. तपासातील हलगर्जीपणा आणि कोणताही ठोस पुरावा नसताना दोन किशोरवयीन भावांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
धारावी पोलिसांनी सीआरपीसी १६९ अन्वये दोषमुक्त करण्याकरिता अर्ज दाखल केल्यानंतर, शुक्रवारी अनिल चौहान (वय १९) आणि नीलेश चौहान (वय २०) या दोन भावांना वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने प्रत्येकी १५,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्याअंतर्गत जामिनावर सोडून दिल आहे. ११ मे रोजी एका २० वर्षीय गृहिणीने आरोप केला होता की, तिचे सासरे मॉर्निंग वॉकसाठी गेल्यानंतर पहाटे ५ च्या सुमारास ती घरी एकटी असताना दोन अज्ञात पुरुष घरात घुसून, तिचे हात बांधत चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी या कृत्याचं व्हिडिओही केले, असा आरोप तिने केला आहे.
तिच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल केला आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. १६ मे रोजी धारावी पोलिसांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणाचा तपास केला आणि चौहान बंधूंना अटक केली. पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार बलात्काराच्या आरोपाखाली अटक केलेले हे दोन तरुण गुन्ह्याच्या वेळी इतर ठिकाणी हजर असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना सोडून दिलंय.
दरम्यान, कुटुंबीयांनी ते दोघे विलेपार्ले इथे असल्याचा व्हिडिओ सादर केला. मात्र, गुन्ह्याचे ठिकाण धारावीपासून सुमारे ८ किमी दूर आहे. दोन्ही ठिकाणी एकाच वेळी उपस्थित राहणे शक्य आहे का? त्यामुळे निष्कर्षापर्यंत येण्याआधी आणि या मुलांना सोडण्याआधी आम्ही सर्व पडताळणी केली असल्याचे, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम