मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या राजकीय संघर्ष, तसेच निवडणूक आयोगाकडून आलेल्या निर्णयाबद्दल कोणत्याही मनसैनिकाने न बोलण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मनसेचे नेते राजकीय संघर्षावर सुरु असलेल्या चर्चेवर बोलत होते. त्यातच शनिवारी निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनसेचे आमदार राजू पाटील, गजानन काळे, संदीप देशपांडे, यांसारख्या नेत्यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर टीका केली होती. मात्र, आता खुद्द मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्ते आणि पदाधिकांसाठी या संदर्भात कोणीही न बोलण्याचे आदेश देत यावर मी स्वतः योग्यवेळी भूमिका मांडेन, असे ठाकरे म्हणाले आहेत.
ते यात म्हणतात की, सध्याच्या राजकीय घडामोडींवर पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याने प्रसारमाध्यमे किंवा सोशल मिडीयावर आपले मत मांडू नये, असा आदेश देत मी ह्यावर योग्यवेळी आपली भूमिका जाहीर करेन, असे म्हणाले आहेत.
सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये.
मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन.
— Raj Thackeray (@RajThackeray) October 9, 2022
आयोगाच्या निर्णयानंतर आमदार राजू पाटील, गजानन काळे, संदीप देशपांडे यांनी यापूर्वी प्रतिक्रिया दिल्या होत्या. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी “चिन्ह बदलतात, कुणाची गोठतात. मात्र, आमचे रेल्वे इंजिन मात्र सुसाट धावते आहे”, असा ट्वीट करत शिवसेनेला टोला लगावला होता. तर “संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही म्हणणाऱ्यांचे नावही संपले आणि चिन्हही. कालाय तस्मै नम:” असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले होते. पण आता राज ठाकरे यांनी दिलेला आदेश, तसेच त्यांची यावर काय भूमिका असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम