Nandurbar : जूनच्या शेवटच्या आठवड्यात नंदुरबार जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र यामुळे प्रशासनाच्या अनेक ढिसाळ कामांची पोलखोल झाली असल्याचं देखील समोर आला आहे.
गेल्या चार वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यामध्ये जूनच्या अखेरीस पाऊस पडण्याची परंपराच जणू पडली आहे. यंदा देखील जून महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत नंदुरबार जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामधील नवापूर तालुक्यात सगळ्यात जास्त पावसाची नोंद करण्यात आली असून सुरुवातीच्याच पावसामुळे तालुक्यातील अनेक नदी-नाले ओसंडून वाहत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तर अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पहिल्याच पावसामध्ये अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील फरशी पूल आणि रस्ते वाहून गेल्यामुळे या ठिकाणच्या दळणवळणाला अल्पविराम लागला आहे.
नवापूर तालुक्यातील वळखुट कोलदा गावादरम्यान काही दिवसांपूर्वीच बनवलेला रस्ता आणि फरशी पूल हा अवघ्या काही तासांच्या पावसामध्येच खचला असल्याने प्रशासनाच्या व ठेकेदाराच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. जवळपास कोट्यावधी रुपये खर्चून ही काम करण्यात आली होती. मात्र काही तासांच्या पावसामध्येच रस्ते आणि पूल खचायला लागले तर पुढील चार महिने कसे निघणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला गेला आहे.
दरम्यान निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर शासनाने कारवाई करावी अशी मागणी देखील नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे. तर या सुरुवातीच्या पावसामुळे बळीराजा चांगलाच सुखावला आहे. सुरुवातीच्या पावसामुळे बळीराजाला आता उत्साह आला असून शेतकामांना यामुळे वेग मिळणार आहे. तर काही ठिकाणी पेरणीच्या कामांना सुरुवात होण्याचे चित्र बघायला मिळत आहे.
मात्र दुसरीकडे जून महिना कोरडाठाक गेल्याने पुढील तीन महिने पाऊस पडेल की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावत असल्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकंदरीतच नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव या भागांमध्ये होत असलेल्या या पावसामुळे एकीकडे शेतकऱ्यांची लगबग तर दुसरीकडे प्रशासनाच्या कामाचे धिंडवडे अस संमिश्र वातावरण बघायला मिळत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम