मुंबई – कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदारीतून मुक्त करण्यास हायकोर्टाने मान्यता दिली आहे. राज्य सरकारने यासंबंधीची याचिका हायकोर्टात दाखल केली होती, कोर्टाने ती याचिका स्वीकारली. पण येत्या चार आठवड्यात नवीन तपास अधिकाऱ्याची नेमणूक करावी आणि आजवर केलेल्या तपासाचा अहवाल सादर करावा असा आदेशही हायकोर्टाने दिला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे हे गेली चार वर्ष या प्रकरणाचा तपास करत होते.
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीकडून चार जणांवर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. आतापर्यंत एकूण आठ आरोपींची एसआयटीकडून चौकशी झाली असून अमित देगवेकर, अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भारत कुरणे यांच्याविरोधात चारशे पानी आरोपपत्र दाखल केले आहे. कट रचणे, गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे, खून करणे या कलमाखाली हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
पुण्यात २०१३ ला डॉ. दाभोळकरांची हत्या, त्यानतंर २०१५ मध्ये कॉम्रेड गोविंद पानसरेंची कोल्हापुरात हत्या करण्यात आली. मात्र तपासयंत्रणा अजूनही अपयशीच असल्याचा याचिकाकर्त्या कुटुंबियांचा आरोप आजही कायम आहे. मात्र या घटनेनंतर शेजारील कर्नाटकात डॉ. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणांत तपास पूर्ण होऊन खटल्याला सुरुवातही झाली. तिकडच्या तपासयंत्रणांनी इथे येऊन आरोपींना अटक केली. त्यानंतर तिथे त्यांच्या चौकशीत इकडच्या या दोन हत्यांचे धागेदोरे सापडले. त्यामुळे नक्की राज्यातील तपासयंत्रणा काय करत आहेत ?, यावर हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त करत दोन्ही तपासयंत्रणांना गंभीर होण्याचा इशारा देत जलदगतीने तपास पूर्ण करण्याचे निर्देश याआधीच दिले होते.
१६ फेब्रुवारी २०१५ रोजी कॉ. पानसरे दाम्पत्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी ते राहत असलेल्या सागरमळा परिसरात दोन बंदुकीतून प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा ह्या जखमी झाल्या होत्या. मात्र कॉ. पानसरे गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर कोल्हापुरातच उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी कॉ. पानसरेंना मुंबईला आणण्यात आले. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना २० फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम