मुंबई: मुंबई वाहतूक पोलिसांना 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्याची धमकी आलेली या प्रकरणात गुन्हे शाखेला दोहा येथे राहणाऱ्या अनिश नावाच्या व्यक्तीवर संशय आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या फोन नंबरवरून हा मेसेज आला होता तो पाकिस्तानचा आहे, तर इंटरनेटवरून व्हॉट्सअॅप मेसेज पाठवण्यासाठी वापरलेला आयपी अॅड्रेस दुसऱ्या देशाचा आहे. तपासाची सर्व माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रालयही आहे, त्यामुळे त्यांना दहशतवादी हल्ल्याच्या तपासाबाबत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील बिजनौरचे सात फोन नंबर
सूत्रांनी सांगितले की, गुन्हे शाखेने व्हॉट्सअॅपला पत्र लिहिले आहे, जेणेकरून रिअल टाइम आयपी अॅड्रेस काढता येईल आणि असे मेसेज कोणत्या देशातून पाठवले गेले आहेत हे कळू शकेल. उल्लेख केलेले सात फोन नंबर यूपीमधील बिजनौरचे असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यापैकी 4 जणांचा मुंबई पोलिसांनी शोध घेऊन चौकशी केली आहे तर , उर्वरित तीन क्रमांक बराच काळ वापरात नाहीत. पोलिसांनी दूरसंचार कंपनीकडून या क्रमांकांची माहिती मागवली असल्याचे सूत्रांनी सांगितले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वसईत आम्ही ज्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली आहे, त्याच्याकडून आतापर्यंत कोणतीही संशयास्पद बाब समोर आलेली नाही, मात्र जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणतीही शक्यता नाकारता येत नाही.
यूपी आणि हरियाणात धागे दोरे
युपी एटीएसच्या सहकार्याने गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. मुंबई क्राइम ब्रँचचे एक पथक उत्तर प्रदेशातही गेले आहे जिथे यूपी एटीएसने पकडलेल्या दोघांची गुन्हे शाखा चौकशी करणार आहे. याशिवाय एक टीम हरियाणाला गेली असून तेथे चौथ्या व्यक्तीला पकडण्यात आले आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडलेले हे चार जण, ज्यांचे नंबर अज्ञात व्यक्तीने ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअॅप नंबरवर शेअर केले होते. सूत्रांनी पुढे सांगितले की, कतारमधील दोहा येथे बसलेला अनिश कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखाही केंद्रीय यंत्रणांसोबत काम करत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम