Maharera : कामामध्ये दिरंगाई, तसेच ठरलेल्या वेळेमध्ये ताबा न देणे यांसारख्या गोष्टी बिल्डर्सच्या बाबतीत सर्वसामान्यांना नेहमीच सहन कराव्या लागत असतात. मात्र अशाच एका बिल्डरला महारेराने चांगलाच दणका देत तक्रारदारांना तब्बल चार कोटी 78 लाख रुपये परत केले आहेत. मुंबईमधील हे प्रकरण असून बिल्डर कामात दिरंगाई, ताबा देण्यात विलंब करत असल्याने त्रस्त झालेल्या ग्राहकांनी महारेराकडे या संदर्भात तक्रार केली होती. याप्रकरणी एन. के. गार्डन चे विकासक भूपेश बाबू यांच्या मालमत्तांचा लिलाव करून तक्रारदारांना पैसे देण्याचा निर्णय महारीराने दिला होता.
तारांगण अवतरले भूतलावरी ; भंडारदरा, घाटघर, कळसुबाई ,मुरशेत परिसरात काजवा महोत्सवाची धूम
20 एप्रिलला या मालमत्तांचा लिलाव करून तक्रारदारांना त्यांचे पैसे सुपूर्द करण्यात आले. विशेष बाब म्हणजे गृहनिर्माण प्रकल्पांच्या बाबतीत येणाऱ्या तक्रारींवर ग्राहकाभिमुख निकाल लागत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे. यामुळे आता अश्या प्रकरणाच्या तक्रारी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लिलाव केलेल्या मालमत्तेच्या रकमेतून 34 तक्रारदारांना चार कोटी 78 लाख रुपये देण्यात आले आहेत. लिलावातून पैसे वसूल करून ग्राहकांमध्ये वाटण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याचं देखील बोललं जात आहे. राज्यातील अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या कारवाया यापुढे अशाच केल्या जातील असा इशाराही महारेराकडून देण्यात आला आहे.
पनवेल क्षेत्रातील मोरबी ग्रामपंचायतीत महारेराने केलेल्या कारवाई मध्ये भूपेश बाबू यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात आला होता यातून तक्रारदारांना ही नुकसान भरपाई देण्यात आली, यात सर्वाधिक रक्कम ही 31 लाख रुपये तर सर्वात कमी रक्कम साडेतीन लाख रुपये असल्याचं सांगितलं गेलं.
नुकसान भरपाईची रक्कम मोठी असल्याने मालमत्तांच्या लिलावा दरम्यान आपले पैसे निघतात की नाही ही भीती ग्राहकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्ष लिलावात मालमत्तांचे आधारभूत मूल्य हे 3 कोटी 72 लाख रुपये होतं. यामध्ये लिलावात चार कोटी 78 लाख रुपयांची बोली लागल्याने तक्रारदारांनी सुटकेचा निश्वास सोडला व त्यांना महारेराकडून ही रक्कम अदा करण्यात आली. दरम्यान यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये आवाज उठवण्याची ताकद आली असून भविष्यात या संदर्भात अनेक तक्रारी वाढू शकतील असा अंदाज वर्तवला जात आहे. तर दुसरीकडे कामात दिरंगाई करणाऱ्या बिल्डर्सना देखील महारेरा कडून हा धक्का देण्यात आल्याने बांधकाम क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. यामुळे महाराष्ट्रात मालमत्ता जप्ती आणि लिलावाची मालिका यामुळे आता लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम