
देवळा ; भऊर ता देवळा येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेत झालेल्या आर्थिक अपहारातील पैसे खातेदारांना तात्काळ परत मिळावेत अशी मागणी आ.डॉ. राहुल आहेर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोमवार(दि. १८) रोजी मुंबईत भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.

तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्याकडे सुद्धा आ.डॉ.राहुल आहेर यांनी निवेदनाद्वारे सदर मागणी केली आहे.
निवेदनाचा आशय असा की , बँक ऑफ महाराष्ट्र, भऊर ता.देवळा ह्या शाखेत परिसरातील भऊर, विठेवाडी, सावकी खामखेडा, वरवंडी, बगडू आदी गावातील शेतकऱ्यांचे खाते असून बँकेतील काही कर्मचारी यांच्याकडून शेतकऱ्यांनी खात्यात भरणा करण्यासाठी दिलेले पैसे खोट्या पावत्या देऊन पैसे भरले असल्याचे भासवून प्रत्यक्ष पैसे भरलेच नसल्याचे उघड झाले आहे.तसेच पीक विमा, कर्जाचे व मुदत ठेवीचे पैसे यात देखील मोठ्या प्रमाणात अपहार झाला असून, प्रथमदर्शी ५ ते ६ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे लक्षात येत आहे.याप्रकरणी देवळा पोलिसांनी बँकेचा शाखा अधिकारी याच्यासह अन्य दोघांवर फसवणूकिचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे .हे तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
सध्या लागवडीचे दिवस सुरू असल्याने व शेतीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासत आहे . त्यात बँकेत झालेल्या अफरातफरीत बहुतांश शेतकऱ्यांचे लाखो रुपयांची फसवणूक झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे . हया घटनेत जबाबदा-या निश्चित करण्याचे काम अथवा तपास हा सुरू राहील परंतु पैसे पण गेले व पीक ही जाण्याच्या द्विधा मनस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा अपहार झालेला पैसा बँकेने जबाबदारी घेऊन त्यांच्या खात्यात वर्ग करावेत . अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम