देवळा : शेतकऱ्यांच्या कांदा पिकासाठी अनुदान म्हणून केंद्र सरकारने मंजुरी दिलेली असताना देखील राज्यातल्या महाविकास आघाडीच्या नाकर्त्या सरकारने अद्याप केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला नसल्याकारणाने अनुदान अद्याप पावेतो देऊ शकत नाही याचा निषेध केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला. देवळा येथील सेवा, सुशासन, गरीब कल्याण संमेलन व देवळा तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत विविध पाणीपुरवठा योजनांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल आहेर हे होते.
भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, भाजपाचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष सचिन दराडे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड, नितीन पांडे, नंदकुमार खैरनार, तरंग गुजराथी, कळवणचे तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, नाशिक तालुकाध्यक्ष नितीन गायकर, दिंडोरी तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, नांदगाव तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, दिशांत देवरे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव, विकास देशमुख, चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, देवळाच्या नगराध्यक्षा भारती आहेर, उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. पवार पुढे म्हणाल्या की, केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षात सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून केंद्रातील योजना गरिबातील गरीब व्यक्तींपर्यंत कशा पोहोचवता येतील याचे नियोजनबद्ध कामकाज केले. सर्वसामान्य शेतकरी, महिलावर्ग, लहान-मोठे व्यावसायिक आदींना केंद्राच्या योजनामधून लाभ मिळवून दिला. आयुष्य मान भारत योजने अंतर्गत पाच लाख रुपयांचे मदतनिधी चे देवळा तालुक्यातून ३९००० नागरिकांचे अर्जांची नोंदणी झाली असून दहा हजार नागरिकांना कार्डचे वाटप झाले आहे. उर्वरित एकोणतीस हजार कार्डचे वाटप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करून घेण्याचे आवाहन केले.
मागील दोन वर्षाच्या काळात भारतीय बनावटीची कोरोना लस तयार करून आपल्या देशातील 195 कोटी लसीकरण पूर्ण केले. भारत इतक्या मोठ्या संख्येने लसीकरण करणारा जगातील पहिला देश ठरला असून याबाबत संपूर्ण जगभर भारताचे कौतुक होत आहे. राज्यात भाजप शासन होते तेव्हा कांद्याचे भाव पडले असताना शेतकऱ्यांच्या पदरी काही जावे या हेतूने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर अवघ्या दोन दिवसात 100 रुपये केंद्र सरकार व शंभर रुपये राज्य सरकार अनुदान जाहीर होत तशी अंमलबावणी झाली होती. तशीच परिस्थिती आता आलेली असताना राज्य शासन केंद्र सरकारच्या नावाने खडे फोडत आहे. मात्र यामागची सत्यता ते लपवीत असून आम्ही केंद्राकडे मागणी करून अगोदरच अनुदान देण्याचा प्रस्ताव मान्य करून ठेवला असून राज्य सरकारने या संबंधीचा प्रस्ताव त्वरित दाखल करावा व शेतकरी उत्पादकांना त्याचा मोबदला त्वरित मिळवून द्यावा असे स्पष्ट सांगितले. कांदा निर्यात सुरू असतानादेखील विरोधक केंद्राच्या नावाने बदनामी करीत आहेत. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे.
यावेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर म्हणाले की देवळा तालुक्यातील अधिकारी मुजोर झाले असून त्यांना वठणीवर आणण्यासाठी लवकरच आमदार व खासदार यांनी जनता दरबार घ्यावा व जनतेच्या समोर त्यांचा पाढा वाचावा आणि सर्वसामान्य जनतेची खदखद ही जनता दरबारातून बाहेर येऊ द्यावी अशी मागणी करत त्यांनी तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी यांच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तालुक्यातील 70% विविध कार्यकारी सोसायटी बिनविरोध निवडणुका करत एक आदर्श ठेवला त्याबद्दल तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपचे संघटनमंत्री रवी अनासपुरे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
दरम्यान गुंजाळनगर येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले तसेच केंद्र पुरस्कृत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेतून लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले याशिवाय तालुक्यातील महिला बचत गटांना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज वितरित करण्यात आले यावेळी तालुक्यातील विकास संस्थांच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजपचे जिल्हा नेते भाऊसाहेब पगार, शहराध्यक्ष अतुल पवार, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष नानू आहेर, प्रतीक आहेर, किशोर आहेर, अनिल आहेर, हर्षद भामरे, हर्षद मोरे, दिनेश मोरे आदींनी संयोजन केले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम