नवी दिल्ली – बऱ्याच दिवसांपासून सुरु असलेल्या रशिया-यूक्रेन युद्धामुळे रशियाविरोधात अनेक युरोपियन व इतर देशांनी आक्रमक पवित्रा घेत रशियावर अनेक निर्बंध लादले. परंतु भारताने रशियाविरोधात आतापर्यंत कुठलेही पाऊल उचलेलं नव्हतं. मात्र, पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत युक्रेनची बाजू घेत भारताने रशियाविरोधात मतदान केले आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे, त्यामुळे जगातील अनेक देश दोन गटात विभागले गेले आहेत. या युद्धात अनेक देशांनी युक्रेनला पाठिंबा दिला आहे, तर अनेक देश रशियाच्या पाठीशी उभे आहेत. पण भारताने सुरुवातीपासूनच यावर ठाम भूमिका घेतली नव्हती. हे युद्ध चुकीचे असल्याचे सांगत भारत संवादातून वादावर तोडगा काढण्याची सातत्याने मागणी करत होता. मतदानावेळी १५ सदस्यीय सुरक्षा परिषदेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला संबोधित करण्यासाठी आमंत्रित केले. विशेष म्हणजे दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच भारताकडून एकाच बाजूने मतदान होत आहे.
भारताच्या भूमिकेमुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का
सुरुवातीपासूनच भारत एका बाजूचे समर्थन करण्याचे टाळत होता आणि रशियाविरोधात तीव्र प्रतिक्रिया देत नव्हता. त्यामुळे अमेरिकेसारखे असंख्य देश भारतावर नाराज होते. त्याचदरम्यान, भारताने रशियाकडून तेल खरेदी-विक्री सुरू केल्यावर पाश्चिमात्य देशांची नाराजी अधिकच वाढली होती. अशा स्थितीत भारताने प्रथमच रशियाविरोधात मतदान करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्यामुळे आता भारताला उघडपणे मैत्रीपूर्ण देश संबोधणाऱ्या रशियाची काय प्रतिक्रिया असेल, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम